Dilip walse Patil
Dilip walse Patil Sarkaranama
पुणे

Dilip Walse Patil News : ...तोपर्यंत माझ्या मनाला आनंद मिळणार नाही; वळसे पाटलांनी व्यक्त केली खंत

सुदाम बिडकर

Pargaon (District Pune) : आंबेगाव तालुक्याचा सर्वच भाग बागायती झाला असताना फक्त लोणी धामणी परिसर हा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे, जोपर्यंत या परिसराला पाणी मिळणार नाही, तोपर्यंत माझ्या मनाला सुद्धा आनंद मिळणार नाही, अशी खंत माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. (My heart will not be happy until Loni Dhamani area gets water : Dilip walse Patil)

आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील सव्वा अकरा कोटी रुपये खर्चाच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेसह एकूण सुमारे १९ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना कुकडी प्रकल्पात समावेश करण्यासाठी तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मंजुरी देऊन सर्वेक्षणाच्या कामास मान्यता दिली होती. सर्वेक्षण झाले, त्या प्रमाणे जर ही योजना झाली तर या परिसरातील २७०० हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. या योजनेसाठी सुमारे १३८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी सरकारकडे प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही वळसे पाटील यांनी दिली.

मी २५-३० वर्षांपासून लोणी गावात येतोय, पण आज आमच्या भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या त्याचा मला खऱ्या अर्थाने आनंद आहे. उर्मिला धुमाळ यांनी पाच वर्षांपूर्वी सरपंच म्हणून सूत्रं हाती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सहकाऱ्यातून लोणी गावांमध्ये आज जी कामं झाली आहेत, त्याबद्दल उर्मिला धुमाळ तुमचं आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनापासून अभिनंदन करतो, असेही त्यांनी नमूद केले.

वळसे पाटील म्हणाले की, गेल्या सात निवडणुकीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला, पाठिंबा दिला. मी विधानसभेत निवडून गेलो. दहा वर्षे विरोधी पक्षांमध्ये काम केलं. इतर वेळेला राज्यातील जवळपाच सगळेच महत्त्वाचे विभाग मला सांभाळायला पक्षाने संधी दिली. ते करत असताना अनेकांची मदतही झाली, त्यामध्ये या गावचे सुपुत्र गृहविभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड यांच्या सहकार्याने पारगावला नवीन पोलिस ठाणे सुरु केले.

म्हाळसाकांत योजनेचे सर्वेक्षण करून अधिकारी गेले. राज्यात घडामोडी घडल्या, सरकार गेलं. नाही तर आम्ही त्या कामाला आणखी गती दिली असती; परंतु ठीक आहे. सरकार जरी नसले तरी आपले प्रश्न आपण सोडवायचे. मी तर माझ्या विरोधी पक्षाच्या मित्रांनासुद्धा विनंती करेन की आता आपण सगळेच या तालुक्यातले आहोत. मते याला दिली का त्याला दिली, माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही. तुमच्या पक्षाचे सरकार आहे, हे झालेलं काम आहे. आता उरलेलं काम तुम्ही करून आणा. तरी आम्हाला त्याच्यामध्ये काही अडचण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT