Nitesh Rane Sarkarnama
पुणे

Nitesh Rane : 'या' पोलिस अधिकाऱ्याची बदली म्हणजे हिंदुत्वाला बळकटी देणारे पाऊल; नितेश राणेंनी सगळंच काढलं

प्रफुल्ल भंडारी

Daund News : दौंडचे पोलिस उप अधीक्षक स्वप्नील जाधव हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. त्यांची बदली झाल्याने शासनाने उचललेले पाऊल योग्य अतिशय योग्य आणि हिंदुत्वाला बळकटी देणारे आहे, असे विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड उपविभागाचे उप अधीक्षक स्वप्नील जाधव यांची अवघ्या तेरा महिन्यांतच सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती येथे बदली झाली आहे.

केडगाव (ता. दौंड) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मधील दोन मुलींचे बळजबरीने धर्मांतर झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असताना सर्व संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांकडून अप्रत्यक्ष पध्दतीने संस्थेला संरक्षण आणि संस्थाचालकांचे लाड केले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी विधान भवनात केला होता. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई आणि उप अधीक्षक स्वप्नील जाधव Swapnil Jadhav यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे उप अधीक्षक यांच्या कार्यपध्दतीविषयी आणि दौंड तालुक्यात वाढत असलेली गोहत्या, गोमांस विक्री आणि वाहतूक प्रकरणी तक्रारी झाल्या होत्या. फेब्रुवारी २०२४ मध्ये कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसी मधील एका कंपनीतून पुणे पोलिसांच्या पथकाने बाराशे कोटी रूपये मूल्य असलेला ६०० किलो मेफेड्रोन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्या पार्श्वभूमीवर बदलीची मागणी जोर धरत होती.

सातत्याने तक्रारी झाल्याने त्यांची ३ जुलै रोजी रात्री एका आदेशाद्वारे बदली केली. स्वप्नील जाधव यांची विनंती बदली असल्याचे समजते. दरम्यान बदली झाल्याने ८ जुलै रोजी दौंड येथील कार्यालयात स्वप्नील जाधव यांनी नूतन उप अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्याकडे पदभार सोपविला.

अशा मोजक्यांमुळे गृह खात्याचे नाव खराब

आमदार नितेश राणे Nitesh Rane यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, `उप अधीक्षक हे सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेत होते. अप्रत्यक्ष पध्दतीने जिहादींना मदत करण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याविषयी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. आम्हाला असे वाटते की, काही मोजक्या अधिकार्यांमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह खात्याचे नाव खराब होते. अशांवर कारवाई होणे गरजेची होती , म्हणून बदली करून उचललेले पाऊल अतिशय योग्य आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT