Narendra Modi, Mohan Bhagwat Sarkarnama
पुणे

RSS Strategy: सरकार कोणाचंही असोत, सत्ता...; RSSच्या रणनीतीवर माजी न्यायमूर्तीचा मोठा दावा

RSS Strategy: काही अब्जाधीशांना ठरवून मोठे केले जात आहे, असा आरोप पुण्यात आयोजित समाजवादी संमेलनात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केला.

Amit Ujagare

RSS Strategy: सरकार कोणाचंही असोत, सत्ता आमचीच असली पाहिजे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची रणनीती आहे, असा खळबळजनक दावा माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केला आहे. त्यामुळं समाजवादी ब्राह्मणांनी संघाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं. समाजवादी चळवळीच्या ९० वर्षपूर्तीनिमित्त पुण्यात तीन दिवसीय समाजवादी संमेलन सुरू आहे. या कार्यक्रमात ते बोलत होते.

समाजवादी संमेलनाच्या आजच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मेधा पाटकर होत्या. 'विकासाच्या संकल्पनेपुढील आव्हाने आणि समाजवादी पर्याय' या विषयावर सत्र झालं. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, अर्थतज्ज्ञ हितेश पोतदार, पर्यावरणतज्ञ सौम्य दत्त, किसान संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्ष अँड. आराधना भार्गव यांनी मांडणी केली. लोकशक्ती अभियानचे संयोजक प्रफुल्ल सामंतरा यांनी सत्राचे सूत्रसंचालन केलं. 'सामाजिक न्याय: जन आंदोलन आणि व्यवस्था परिवर्तन' या विषयावर दुसरं सत्र झालं. या सत्रात मधू मोहिते, निरंजन टकले, सुशीला मोराळे, रत्ना व्होरा सहभागी होते तर अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील होते.

कोळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक हे भित्रे आहेत. सरकार कुणाचेही असो मात्र सत्ता आमच्याच हातात असली पाहिजे ही संघाची रणनीती आहे. समाजवाद्यांमधील ब्राह्मणांनी संघाच्या विरोधात ठाम भूमिका घ्यावी. देश संकटात आला तेव्हा समाजवादी चळवळीनं देशाला सावरलं आहे. समाजवादी चळवळ मजबूत असती तर मोदी इतके वर्षे सलग सत्तेत राहिले नसते. सरकार पाडण्यात समाजवादी माहीर आहेत, असं मत सुशीला मोराळे यांनी व्यक्त केलं. तर निरंजन टकले म्हणाले की, शाळेच्या अभ्यासक्रमातून खोटा आणि विखारी इतिहास शिकवला जातो. त्याविरोधात प्रतिकार करायला हवा, असं केलं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक पळून जातील. विजयादशमीदिनी संघाला शंभर वर्षे होत आहेत, त्या दिवशी संघाचा रावण जाळला पाहिजे.

दरम्यान, मेधा पाटकर यांनी सरकारच्या धोरणांवर यावेळी सडकून टीका केली. त्यांनी म्हटलं की, राज्यांची विकासनीती ही संविधानातील तत्वांच्या आधारे ठरत नाही. काही अब्जाधीशांना ठरवून मोठे केले जात आहेत. आर्थिक असमानता नष्ट करण्याची राजकीय इच्छाशक्ती नाही. आजच्या काळात विकास हा मंत्र झाला आहे. मात्र आर्थिक असमानता यालाच विकास म्हटले जात आहे. मणिपूरमधील हिंसाचार हा केवळ दोन समाजातील नसून त्याच्या मुळाशी विकास आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनसंपत्तीची नासधूस केली जात आहे, असंही पाटकर यावेळी म्हणाल्या.

तर देशात गरीब गरीब आणि श्रीमंत श्रीमंत होत आहेत. गरिबी श्रीमंती हा मोठा भेद आहे. मात्र देशाचे पंतप्रधान हे बेशरमसारखे म्हणतात की, श्रीमंत होणे हे पाप नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. राज्य आणि देशातील अनेक जागा ह्या अदानी, अंबानी यांच्या घशात घातल्या जात आहेत. समृद्धी महामार्ग उभारणीत 20 हजार कोटी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार महाराष्ट्रातील पक्ष फोडण्यात आणि विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी वापरला आहे. काँग्रेस आणि समाजवादी चळवळ यांचे पूर्वपरंपार संबंध आहेत. मात्र, समाजवादी आणि काँग्रेसचे संबंध हे 'तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना' असे राहिले आहेत, असा मिश्किल टोलाही सपकाळ यांनी यावेळी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT