Raj Thackeray  Sarkarnama
पुणे

भाजपाशी युतीची चर्चा तूर्त नको : राज ठाकरेंची भूमिका

umesh ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुण्यात किंवा राज्यात अन्यत्र भारतीय जनता पार्टीसोबत युती करण्याच्या विषयात तूर्तास कोणतीही चर्चा नको, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. पुण्यातील स्थानिक राजकीय गणित पाहून भारतीय जनता पार्टीशी युती करण्याची तयारी पुणे शहर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी दाखविली होती. पक्षाचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी या संदर्भात तयारी दर्शविली होती. या पाश्‍र्वभमीवर ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ही भूमिका स्पष्ट केली आहे.

पक्षाचे नेते अनिल शिदोरे यांनी तीन सदस्यांचा प्रभाग झाला तर आपल्याला कसा प्रतिसाद मिळेल अशी विचारणा शहराध्यक्ष मोरे यांच्याकडे केली होती.या संदर्भाने बोलताना शहराध्यक्ष मोरे यांनी भाजपासोबत जाण्याची तयारी आपण दाखवली होती. आमची ही भूमिका स्थानिक पातळीवरील परिस्थिती पाहून असली तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे घेतील तोच निणय अंतीम असेल, असे शहराध्यक्ष मोरे यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

या पाश्‍र्वभूमीवर राज ठाकरे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भाजपाशी युतीची चर्चा सध्या करू नका, अशा सूचना दिल्या आहेत. या सूचना केवळ पुण्यापुरत्या नव्हे तर राज्यात सर्वत्र लागू असल्याचे सांगण्यात आले.

पुण्याची सत्ता हाती घेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सज्ज झाली आहे. मात्र, या परिस्थितीत भाजपाने मनसेला सोबत घेतले तर राष्ट्रवादीला सत्तेत येण्यापासून रोखता येणार आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे २९ जागा जिंकत विरोधी पक्षनेतेपदावर उडी घेतली होती. मात्र, २०१७ निवडणुकीत पक्षाचे पुरते पानिपत झाले. पक्षाचे केवळ दोन नगरसेवक निवडून आले. पक्षाचा मतदार आजही टिकून आहे. त्यावेळी केवळ चार सदस्यीय प्रभागामुळे मनसेचे नुकसान झाल्याची भूमिका पक्षाचे शहराध्यक्ष मोरे यांनी मांडली आहे.

२०१२ च्या निवडणुकीत दोन सदस्यांचा प्रभाग होता.एक वा दोन सदस्यांचा प्रभाग असेल तर आम्हाला फारशी अडचण येत नाही. दोन किंवा तीनच्या प्रभागात आमची ताकद कमी पडते. तीन सदस्यांचा प्रभाग झाला तर भाजपासोबत जाऊन महापालिकेत मोठे यश मिळू शकते, अशी भूमिका मोरे यांनी दोन दिवसांपूर्वी ‘सरकारनामा’शी बोलताना मांडली होती.’’

कसबा, कोथरूड व हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघात मनसेची चांगली ताकद आहे. या तीन मतदारसंघात १८ ते २२ ठिकाणी मनसे चांगली लढत देऊन विजयी होऊ शकतो. गेल्यावेळी चार सदस्यांचा प्रभाग होता. भाजपाची हवा होती. तरीही मनसेच्या १८ उमेदवारांनी सहा ते १४ हजारांदरम्यान मते मिळाली होती. त्यामुळे स्वतंत्र लढलो तर किमान ४० ते ५० ठिकाणी भाजपाचे नुकसान करू शकतो, असा दावा मनसेच्यावतीने करण्यात येत आहे.

एक किंवा दोन सदस्यांचा प्रभाग असेल तर मनसेला चांगले यश मिळू शकते. शिवसेना सध्या राज्यात सत्तेत असली तरी पुण्यात मनसेची ताकद शिवसेनेपेक्षा अधिक आहे. महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक अधिक दिसत असले तरी मनसेच्या उमेदवारांचे एकुण मतदान शिवसेनेपेक्षा अधिक आहे. या पाश्‍र्वभूमीवर स्थानिक नेत्यांची इच्छा असली तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्या युतीवर काही न बोलण्याचा आदेश दिल्याने युतीची चर्चा थांबली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT