Pimpri- Chinchwad Latest News Sarkarnama
पुणे

Pimpri TDR Scam : चौकशीसाठी सत्ताधाऱ्यासंह विरोधकही एकवटले, पिंपरी आयुक्तांवर संक्रात?

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri - Chinchwad News : नागपूर येथे गेल्या महिन्यात झालेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित झालेल्या पिंपरी-चिंचवडमधील शेकडो कोटी रुपयांच्या टीडीआर घोटाळ्याचे पडसाद उमटणे अद्याप सुरुच आहे. विरोधी बाकावरील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर (शरद पवार गट) राज्यातील सत्ताधारी भाजपचे स्थानिक आमदार,पदाधिकाऱ्यांनीही या घोटाळ्याची चौकशी करून कारवाईची मागणी केल्याने हा टीडीआर दिलेले महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

दरम्यान,सर्वपक्षीयांची टीडीआर घोटाळा चौकशीसाठी युती झाल्याने शेखरसिंहांच्या बदलीची शक्यता वाढली आहे. एवढेच नाही,तर त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या मर्जीतील अधिकारी आयुक्त म्हणून दोन नावांचीही चर्चा सुरु झाली आहे. पण,त्यातील एका आयएएस अधिकाऱ्याला पुण्य़ात आयक्त म्हणून जायचे आहे. त्यामुळे शेखरसिंहावर `संक्रात`आली, तर नवे आयुक्त हा पालकमंत्र्यांच्या मर्जीतील असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच तो आगामी लोकसभा निवडणूक विचारात घेऊन नियुक्त केला जाणार,यात शंका नाही.राज्यात २०२२ ला आघाडीचे सरकार जाऊन युतीचे आले.त्यानंतर बदल्यांचा मोठा खेळ झाला.त्यात त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरीत आयुक्त म्हणून आणलेले राजेश पाटील यांचीही विकेट पडली. त्यांची मुदतपूर्व बदली होऊन १६ ऑगस्ट २०२२ ला शेखरसिंह हे आले.

गेल्या दीड वर्षात शेखरसिंह यांना आपल्या कामाचा ठसा उमटवता आला नाही. सत्ताधाऱ्यांच्या हातातील कळसूत्री बाहूले बनल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधी पक्षांनी केला.त्यात चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी पालिकेच्या जॅकवेल बांधणीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार केली.नंतर शहरातील इंटरनेट केबल टाकण्याचे काम गुंडाशी सबंधित कंपनीला देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर झाला.तर, आता शेकडो कोटींच्या टीडीआर घोटाळ्याचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले.

दिलेला ११३६ कोटी रुपयांचा हा टीडीआर रद्द करून त्याची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीची मागणी अश्विनी जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली.त्यांनतर त्यांच्याकडेच भाजपचे(bjp) माजी शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी ,तर थेट शेखरसिंहांच्या बदलीचीच मागणी रविवारी (ता.१४)केली.‘खाबुगिरी’अन् ‘बाबुगिरी’ला आळा बसवण्यासाठी त्यांनी ही मागणी केली. त्यातून पालिका आयुक्तांच्या पुन्हा एका मुदतपूर्व बदलीची आणि शेखरसिंहांवरील ‘संक्रांती’ची चर्चा शहरात पुन्हा रंगली.

शेखरसिंहांच्या इतर प्रकल्पांच्या निविदाही संशयास्पद असल्याचा आरोप थोरातांनी केला आहे. याअगोदर सातारा जिल्हाधिकारी असताना देखील त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप झाल्याने त्यातून त्यांची मिडटर्म बदली पिंपरीत करण्यात आली,असा दावा थोरातांनी केला.आय़ुक्तांच्या हेकेखोरीमुळे भाजपची पालिकेत सत्ता असतानाही लोकोपयोगी प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडचणी आल्या,त्यांच्यामुळे महायुतीचे सरकार तसेच भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. शहरात सरकार आणि भाजपाबाबत ‘कटू’भावना निर्माण होत असल्याने त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे,असे थोरात यांचे म्हणणे आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT