Prithviraj Chavan, Narendra Modi Sarkarnama
पुणे

Prithviraj Chavan News : त्या पैशांचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर, पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा आरोप !

Sudesh Mitkar

Pune News : निवडणूक रोखे, इन्कम टैक्स तसेच इतर सरकारी संस्थांमार्फत विविध कंपन्यांकडून गोळा केलेल्या पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर भाजपाकडून केला जात आहे. भाजपाकडे पैसा मोठ्या प्रमाणात असल्याने आधी सरकार पाडणे व आमदार विकत घेण्यासोबतच आता मते विकत घेण्यासाठी देखील पैशाचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

चव्हाण म्हणाले,संपूर्ण देशात मोदी विरोधी लाट आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रचार यंत्रणेत काही त्रुटी होत्या, मात्र महाराष्ट्राचे कॉंगे्रस प्रभारी रमेश चेल्लीथाला यांनी बैठक घेऊन योग्य सूचना देऊन त्रुटी दूर करण्यात आल्या. निवडणुकीच्या सुरूवातीला भाजपाने 370 पार ची घोषणा दिली. या घोषणेचा अर्थ देशाची घटना बदलण्यासाठी 2/3 बहुमत संसदेत आवश्यक आहे, त्यासाठी 370 जागा हव्या होत्या. सत्य पुढे आल्यानंतर ही घोषणा बदलून 400 पार की घोषणा केली, जी नंतर हवेतच राहून गेली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत वर्ष 2019 ला महाराष्ट्रात 6 सभा घेतल्या होत्या, मात्र यावेळी त्यांच्या आतापर्यंत 12 सभा झाल्या आहेत. महाराष्ट्राची निवडणुक अत्यंत महत्वाची असल्याने मोदींनी पहिल्यांदा प्रोटोकॉल तोडून दोन रात्री महाराष्ट्रात घालविल्या. नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष कामकाज केल्यानंतरही त्यांच्याकडे मुद्दे नसल्यानेच त्यांना राहुल गांधी व काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलण्याची वेळ आली आहे. तसेच काँग्रेसच्या जाहिरनाम्यात जे लिहिलेले नाही,ते मुद्दे भाजपा पुढे आणत आहे. मोदींच्या सभांना गर्दी नाही, त्यांना प्रतिसाद देखील मिळत नाही. पैसे देऊन माणसे बोलवण्याची वेळ येत आहे. आता तर मोदींची सभा नको असे सांगितले जात आहे.

निवडणूक रोखे माध्यमाने सर्वांत मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. याकरिता मोदी सरकार ने कंपनी कायद्यामध्ये देखील बदल केलेला आहे. हा बदल रद्द करणे आवश्यक आहे. पूर्वी राजकीय पक्षांना देणगी देण्याकरिता संबंधित कंपनी मागील 3 वर्षांच्या नफ्याच्या 7.5 टक्के रक्कम देणगी स्वरूपात देऊ शकत होती. मात्र हा बदल रद्द करणे आवश्यक आहे, कारण ही अट रद्द केल्याने ज्या कंपन्या फायद्यात नाहीत, त्यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्यात आले आहेत.

त्यामुळेच भाजपाला (BJP) जेवढे पैसे मिळाले आहेत ते निवडणुक आयोगाकडे जमा केले जावेत. विरोधी पक्षांवर दबाव आणून निवडणुक जिंकण्यासाठी भाजपाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली, तसेच काँग्रेस पक्षाची विविध बँकांची खाती देखील सील करण्यात आली. भाजपाला निवडणुक जड जात असल्यानेच भाजपा मुद्यांवरून भरकटली आहे. त्याच्या विरूद्ध महाविकास आघाडी व इंडिया आघाडीला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT