Pune BJP News Sarkarnama
पुणे

Pune BJP News : 'सबका हिसाब होगा'; भाजप पदाधिकाऱ्यांच्या कामाचं होणार पोस्टमार्टेम ...

Sudesh Mitkar

Pune Lok Sabha News : पुणे लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता भाजपाने शहरातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे पोस्टमार्टेम करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीदरम्यान प्रत्येकाला दिलेली जबाबदारी त्याने व्यवस्थितरित्या आणि प्रामाणिकपणे पार पडली का?

याचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्याबाबतचा अहवाल वरिष्ठ पातळीवरती पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे हा अहवाल अनेकांच्या 'राजकीय भवितव्य' ठरवणारा ठरू शकणार आहे. कारण याच अहवालाच्या आधारे पुढील विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांची गणितं आणि पक्षाचे तिकीट ठरणार असल्याचं बोललं जातं आहे.

यंदाची पुणे लोकसभेची निवडणूक चौरंगी ठरली. महाविकास आघाडी आणि महायुती बरोबरच वंचित सह एमआयएम पक्षाने आपला उमेदवार दिला होता. निवडणूक जरी चौरंगी असली तरी खरी लढत ही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे मुरलीधर मोहोळ अशीच होती. सुरुवातीला भाजपला एकतर्फी वाटणारी लढत शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने अधिक चुरशीची केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कसबा पोटनिवडणुकीतील मिळालेल्या पराभवामुळे या निवडणुकीमध्ये शहर भाजपाकडून विशेष लक्ष देण्यात आले होते. त्या पद्धतीने कामाची नियोजन करून जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या होत्या. बूथ कमिटीपासून लोकप्रतिनिधीपर्यंत प्रत्येकाला जबाबदारी दिली गेली होती.

ती जबाबदारी त्यांनी पाळली का आणि प्रत्यक्षात किती काम केले का ? याचे मूल्यमापन आता भाजप करत आहे. त्यानंतर हा तयार करण्यात आलेला संघटनेचा अहवाल पक्षच्या वरिष्ठांकडे पाठविला जाणार आहे. भाजपच्या केंद्र आणि राज्य पातळीवरील संघटनेच्या सूचनेवरून शहर पातळीवरील संघटनेमधील कोअर कमिटी हा अहवाल तयार करत आहे.

कमिटीचे प्रमुख म्हणून चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर जबाबदारी असून त्यामध्ये पुणे लोकसभेचे समन्वयक श्रीनाथ भिमाले आणि प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांचा समावेश आहे. गेली दोन महिने चाललेल्या प्रचार यंत्रणेवर या कोअर कमिटीचे लक्ष होते.

त्यानुसार प्रत्यक्षात बूथ लेवलवर किती टक्के काम झाले? किती टक्के मतदान झाले? पन्नाप्रमुख प्रत्यक्षात किती मतदारांपर्यंत पोहोचले? स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधींनी काम केले का? मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात किती यश आले? अशा या गोष्टींचा कमिटीने अभ्यास केला असून, हा अहवाल तयार करण्यात येणार आहे.

या अहवालातून कोणी काम केलं, कोणी नुसताच देखावा केला, कुठल्या भागात जास्त काम झालं, कोण कामात कमी पडलं, याबाबतच्या बाबी समोर येणार आहे. त्यामुळे ज्या भागात काम झालेले नाही, अशा ठिकाणी आगामी काळात भाजपकडून (BJP) मोठा बदल होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT