School Mid Day Meal Sarkarnama
पुणे

School Mid Day Meal : 12 शिट्या देऊनही वाटाणा शिजेना; विद्यार्थ्यांच्या पोटदुखीनंतर पोषण आहारावर बहिष्कार

School meal boycott after food quality concerns in Junnar Pune : जुन्नरच्या काळवाडीत निकृष्ट दर्जाच्या साहित्याची तक्रार; अन्न व औषध प्रशासनाने नमुने घेतले, अहवालानंतर कारवाईची मागणी

सरकारनामा ब्युरो

By सिद्धार्थ कसबे, जुन्नर, पुणे

Kaalwadi school midday meal controversy : शाळेत दिलेल्या वाटाण्याला तब्बल 12 शिट्या देऊनही ते शिजत नव्हते, शिजवलेला आहार खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पोटात दुखणे आणि प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाचा माल पुरवला जाणे.

या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या पुणे जिल्ह्यातील काळवाडी (ता.जुन्नर) ग्रामस्थांनी अखेर आक्रमक भूमिका घेत शालेय पोषण आहारावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे.

शालेय समितीची बैठक सुरू असतानाच काही विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत असल्याची तक्रार समोर आली. याच वेळी शाळेत (School) पोषण आहाराच्या सामानाने भरलेला टेम्पो दाखल झाला. संशय आल्याने ग्रामस्थांनी तत्काळ तो टेम्पो रोखून धरला. टेम्पोतील हळद आणि मिरची पावडरची तपासणी करून त्याची घरातील साहित्याशी तुलना केली असता शाळेत आलेला माल अत्यंत निकृष्ट व भेसळयुक्त असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या गंभीर प्रकारानंतर ग्रामपंचायतीने (GramPanchayat) तातडीने अन्न व सुरक्षा प्रशासनाकडे (FDA) तक्रार दाखल करत त्यांना या संबंधित पत्र पाठवले. ग्रामस्थांनी गुरुवारी मालाने भरलेला टेम्पो पकडल्यानंतर शुक्रवारीअन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी संतोष सावंत आणि त्यांच्या टीमने काळवाडी गावात प्रत्यक्ष भेट दिली. अधिकारी व त्यांच्या पथकाने टेम्पोतील शालेय पोषण आहारातील पदार्थांचे नमुने ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेण्यात येणार आहे. या चाचणीचा अहवाल 1 महिन्यात येईल असे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रशासकीय अहवालावर पूर्णपणे अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वता देखील पारदर्शकतेसाठी अन्नपदार्थांचे नमुने प्रशासनाच्या परवानगीने स्वतंत्र तपासणी साठी सोबत घेतले आहेत. शालेय व्यवस्थापन समिती,काळवाडीचे सरपंच तुषार वामन यांनी पंचायत समितीला तसेच अन्न व औषध प्रशासनाला अधिकृत पत्र दिले असून काळवाडी गावाने पोषण आहारावर पूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

काळवाडी जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजन योजना आम्ही बंद करत आहोत.शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना आम्ही ग्रामस्थ आमच्या परीने भोजन पुरवठा करू. जोपर्यंत चांगल्या दर्जाचा आणि सुरक्षित आहार मिळत नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहील असा इशारा उपसरपंच बाबाजी वामन व ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य जयसिंग पोटे,सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे यांनी पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांना या निकृष्ट पोषण आहारा बद्दल प्रश्न विचारले.

सरपंच तुषार वामन यांनी सांगितले की, वाटाण्याच्या बारा शिट्या घेतल्या तरी तो शिजत नाही. पोषण आहारातील तांदुळ, चवळी,मुगडाळ,मटकी,मसूर डाळ,वाटाणा,सोयाबीन,खाद्यतेल आदी पदार्थांचे योग्य ते नमुने घेऊन त्याचा अहवाल सादर करावा व त्यात काही चुकीचे आढळल्यास संबधीतांवर कारवाई करावी. शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रतीचा पोषण आहार मिळावा अशी आमची सर्वांची मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT