Pune Underground Road Project: पुण्यातील गंभीर वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटामाटात जाहीर केलेला ‘पाताललोक’ म्हणजेच भूमिगत भुयारी मार्ग प्रकल्प प्रत्यक्षात येण्यापूर्वी कागदावरच अडकण्याची चिन्हे आहेत. अवाढव्य खर्च, वापरावरील मर्यादा आणि व्यावहारिक अडचणींमुळे हा ड्रीम प्रोजेक्ट अव्यवहार्य ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून, पुणेकरांना दाखवलेले पाताललोकचे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
काय आहे पाताललोक?
काही महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शहरांतर्गत भुयारी मार्गाचा पर्याय राबवण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी महापालिकेला आराखडा तयार करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र, या प्रकल्पाच्या प्राथमिक स्वरूपावरूनच अनेक तांत्रिक व आर्थिक पेच समोर आले आहेत.
जागतिक मानकांनुसार शहरांतर्गत भुयारी मार्गांचा वापर मुख्यत्वे लहान चारचाकी वाहनांसाठीच केला जातो. यामध्ये दुचाकी, ट्रक्स, तसेच इंधन व ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंदी असते.
अवाढव्य खर्च अन् 'टोल'चा भुर्दंड
भुयारी मार्गाच्या निर्मितीसाठी येणारा अवाढव्य खर्च पाहता हा प्रकल्प 'सार्वजनिक-खासगी भागीदारी' तत्त्वावरच विकसित करावा लागणार आहे. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांवर मोठा 'टोल' आकारला जाईल.
पुण्यातील वाहनसंख्येचे वास्तव
पुण्यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. ज्या दुचाकीस्वारांना या मार्गावर प्रवेशच असणार नाही आणि ज्या चारचाकी चालकांना टोल द्यावा लागेल, अशा परिस्थितीत हा मार्ग प्रत्यक्ष वाहतूक कोंडी सोडवण्यात किती यशस्वी ठरेल, यावर मोठे प्रश्नचिन्ह आहे.
'पाताललोक' पालिकेच्या प्राधान्यक्रमात थेट तिसऱ्या टप्प्यात!
यासंदर्भात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेचा प्राधान्यक्रम स्पष्ट झाला आहे. त्यानुसार पहिला टप्यात एचसीएमटीआर उन्नत मार्ग दुसरा टप्पा रिंग रोड प्रकल्प तर तिसरा टप्यात 'पाताललोक' भुयारी मार्ग असेल म्हणजेच, पालिकेच्या अजेंड्यावर भुयारी मार्ग सर्वात शेवटी फेकला गेला असून, जागतिक स्तरावरील तज्ज्ञ एजन्सीच्या अभ्यासाचा अहवाल आल्यानंतरच यावर पुढील निर्णय होणार आहे.
राजकीय घोषणाबाजी आणि वास्तवातील दरी
पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत असताना, सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या घोषणा केल्या जातात; मात्र त्यांची व्यवहार्यता तपासताना प्रकल्पांचे पितळ उघडे पडते. केवळ चारचाकी वाहनांच्या सोयीसाठी अब्जावधी रुपयांचा भुयारी मार्ग उभारणे आणि पुणेकरांवर टोलचा बोजा लादणे कितपत योग्य आहे? 'पाताललोक'च्या अभ्यासासाठी जागतिक दर्जाच्या एजन्सीची नियुक्ती होणार असली, तरी सध्याचे नियोजन पाहता फडणवीसांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ राजकीय चर्चेचाच विषय ठरतो की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.