Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

Gram Panchayat Election : पालकमंत्र्यांसह भाजपचे बडे नेते उतरले बाराशे मतदारांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात!

महेंद्र शिंदे

कडूस (जि. पुणे) : पुण्याचे (Pune) पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बुधवारी (ता. १४ डिसेंबर) सायंकाळी खेड (Khed) तालुक्यातील १२७२ मतदार संख्या असलेल्या आदिवासी बहुल भागातील ग्रामपंचायत (Gram Panchyat) निवडणुकीची (Election) रणधुमाळी सुरू असलेल्या साकुर्डी गावात हजेरी लावली. 'चांगल्या माणसांच्या आपण पाठीशी उभे राहायचे असते. यामुळे चांगल्या माणसांना निवडून द्या, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे,' असे पाटील यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. (Pune's Guardian Minister Chandrakant Patil during campaign for Gram Panchayat Elections)

खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या उशालगत दुर्गम भागातील १६७६ लोकसंख्या व १२७२ मतदार संख्या असलेल्या साकुर्डी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तीन वॉर्डमधून नऊ सदस्य व लोकांमधून सरपंच निवडून देण्यासाठी रविवारी (ता. १८ डिसेंबर) मतदान होणार आहे. यासाठी एकास एक पद्धतीने दोन पॅनेलमध्ये निवडणुकीची सरळ लढत होत आहे. दोन पॅनेलमध्ये 'काँटे की टक्कर' अनुभवायला मिळत आहे.

प्रचार शिगेला पोचलेला असतानाच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (ता. १४ डिसेंबर) सायंकाळी अचानक गावात हजेरी लावली. पालकमंत्र्यांनी नुसतीच हजेरी लावली नाही, तर जोरदार भाषणसुद्धा ठोकले. यामुळे एरव्ही पंचक्रोशीबाहेर चर्चेत नसलेली साकुर्डी ग्रामपंचायतीची निवडणूक तालुक्यातील राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, 'मी सगळ्यांना न्याय देणारा आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसवाले पण त्यात आहेत. पण जी योग्य व चांगली माणसे आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचारात फिरतो आहे, त्यांना विकास निधीमध्ये प्राधान्य देईन. ग्रामपंचायतीची निवडणूक पार्टीच्या चिन्हावर लढवली जात नाही, पण चांगल्या माणसांच्या पाठीशी उभे राहायचे असते. चांगल्या लोकांना निवडून द्या, एवढे सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे.' असे म्हणत पाटील यांनी आपल्या भाषणात गावात झालेल्या विविध कामांची यादीच वाचून दाखवली.

सुमारे सोळा कोटींची कामे मार्गी लागल्याचे सांगत आणखी नवीन मागणी असलेल्या कामांची यादी वाचून 'मी ही कामे तुम्हाला दिली, असे मी म्हणणार नाही,' असे 'दिली' या शब्दावर जोर देत म्हणाले 'दिली म्हणालो तर निवडणूक काळात अमिष दाखवल्यासारखे होईल व आचारसंहितेचा भंग होईल. मला अडचणीत आणण्यासाठी लोक रोज कॅमेरा लावून बसून आहेत. यामुळे ही कामे दिली असे म्हणणार नाही, परंतु याचा सकारात्मक विचार करेन, अशी काहींशी सावध भूमिका चंद्रकांदादांनी आपल्या भाषणात घेतली.

पाटील यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनधन योजना, गरिबांसाठी उज्वला गॅस योजना, गरिबांना मोफत घरे व शौचालय बांधून देण्याची योजना, दोन कोटी लोकांना मोफत वीज, बावीस हजार गावांमध्ये सुरू असलेल्या हर घर नल-घर घर जल उपक्रमांतर्गत पाणी योजना आदी लोकाभिमुख योजनांबद्दल भाषणात माहिती सांगितली. या वेळी माजी मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले, भगवान पोखरकर, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, रामदास निर्मळ, अजय चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT