Bachchu Kadu, Sambhajiraje Chhatrapati, Raju Shetty,manoj Jarange Patil, Raj Thackeray, Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : ...तर राज ठाकरेंची मनसे देखील तिसऱ्या आघाडीत, राजू शेट्टींनी स्पष्टचं सांगितलं

Sudesh Mitkar

Pune News, 19 Sep : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेने (MNS) आगामी विधानसभा निवडणुका मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच सध्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय महाराष्ट्रातील जनतेसमोर देण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केला आहे.

त्यामध्ये मनसेचा देखील समावेश होणार का? असा प्रश्न तिसऱ्या आघाडीतील नेत्यांना विचारला असता राजू शेट्टी यांनी याबाबत आपली स्पष्ट भूमिका केली. तिसऱ्या आघाडी संदर्भातील महत्वपूर्ण बैठक आज (ता.19 सप्टेंबर) पुण्यात पर पडत आहे.

या बैठकी दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) म्हणाले, प्रहारचे आमदार बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला येणार होते. मात्र, त्यांना उशीर झाला आहे. आघाडीचं नाव काय असावं? आघाडी कशी असेल यावर चर्चा होणार आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाला पर्याय देऊ शकतो, म्हणून आघाडी करायची आहे.

सध्याच्या सत्ताधाऱ्यांना नागरिक कंटाळले आहेत. आजच्या बैठकीत तिसरी आघाडीची दिशा स्पष्ट होईल. या तिसऱ्या आघाडीमध्ये आमच्या सोबत शेतकरी चळवळीतील नेते आहेत. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले, "शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याचं ठरवलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांसमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, त्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून तिसरी आघाडी काम करेल.

महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही

हा केवळ आमचा प्रयत्न आहे. जसजशा बैठका होतील तसं या आघाडीला एक व्यापक स्वरूप मिळेल. प्रत्येक मतदारसंघातील एक आश्वासक चेहरा निश्चित करून आमच्या सर्व जणांची ताकद एकत्रितरित्या त्यांच्या मागे उभी करण्याचं आमतं नियोजन आहे." तर, गेल्या पाच वर्षात अडीच वर्ष आम्ही महाविकास आघाडी आणि अडीच वर्षे महायुतीचे सरकार पाहिलं. मात्र ही दोन्ही सरकार अपयशी ठरली आहेत.

राज्यात महिला असुरक्षित आहेत. तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कामगारांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न सत्ताधाऱ्यांना सोडवले नाहीत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे जे प्रमुख आहेत ते दोन आघाड्यांमध्ये विभागले आहेत. या प्रस्थापितांना शह देण्यासाठी तिसरी आघाडी घेऊन येत आहोत. कारण महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही. तो सामान्य जनतेचा आहे.

सध्या महाराष्ट्रातील राजकीय संस्कृती रसातळाला गेली आहे. सध्या युती आणि आघाडीमध्ये टोळी युद्धाप्रमाणे राजकारण सुरू आहे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत आहोत, असं शेट्टी म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आगामी निवडणुकांमध्ये एकला चलोची भूमिका घेतली आहे. त्यामुळे तिसरा आघाडीत येण्याबाबत जर राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला अथवा तसे संकेत दिले, तर आम्ही सकारात्मक विचार करू कारण शहरी भागातही आम्हाला काम करायचं आहे, असंही राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या तिसऱ्या आघाडीतील सहभागाविषयी सकारात्मक भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता या आघाडीचा प्रयोग कितपत यशस्वी होणार आणि मनसे जरांगे पाटील त्यात सहभागी होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT