Raju Shetti  Sarkarnama
पुणे

Raju Shetti : पराभवाने खचून घरी बसतील ते राजू शेट्टी कसले? बळिराजाच्या कर्जमुक्तीसाठी उतरले मैदानात!

Vijaykumar Dudhale

Baramati, 23 June : शेतकऱ्यांसाठी जीवाचा पर्वा न करता लढणारे राजू शेट्टी यांचा २०१९ आणि २०२४ मध्ये सलग दोन लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. मात्र, पराभवाने खचून जातील ते राजू शेट्टी कसले? बळीराजासाठी शेट्टी पुन्हा मैदानावर उतरले असून एक जुलैपासून ते शेतकरी कर्जमुक्त अभियान सुरू करणार आहेत.

राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) लढवली. मात्र, त्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात या वेळी ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. मागील २०१९ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्या वेळीही त्यांचा धैर्यशील माने यांच्याकडून पराभव झाला होता. शेतकऱ्यांसाठी (Farmer) देशाच्या संसदेत पुन्हा जाण्याची शेट्टी यांची इच्छा अपुरी राहिली आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे व्रत हाती घातलेल्या राजू शेट्टी यांनी या पराभवानंतर खचून न जाता पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी राजू शेट्टी हे एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान सुरू करणार आहेत. या अभियानाची सुरुवात वसंतराव नाईक यांच्या पुसद या गवापासून होणार आहे, अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बारामती येथे आयोजित करण्यात आली होती. शनिवारी आणि रविवारी झालेल्या बैठकीत शेतकरी कर्जमुक्ती अभियान राबवण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. याशिवाय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 15 ठरावही करण्यात आले आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. ती मागणी मान्य न झाल्यास येत्या एक जुलैपासून पुसद येथून हे कर्जमुक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. कर्जमुक्तीबरोबरच संपूर्ण वीजबिल माफी करावी, अशीही प्रमुख मागणी राजू शेट्टी यांची असणार आहे.

विधानसभेबाबत योग्यवेळी धोरण जाहीर केले जाईल

आगामी दोन महिन्यांत शेतकरीहिताची भूमिका महाविकास आघाडी आणि महायुती यापैकी कोण घेतात, हे पाहूनच विधानसभा निवडणुकीबाबतचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धोरण ठरविले जाणार आहे. सध्या तरी आम्ही ‘एकला चलो’च्या भूमिकेत आहोत. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर केला जाईल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सध्या अनेकजण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT