Rahul Kul
Rahul Kul Sarkarnama
पुणे

Bazar Samiti Result : रमेश थोरातांनी राऊतांना बोलावले; पण अर्धी सत्ता गमावली

रमेश वत्रे

Daund Bazar Samiti News : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या वीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात यांची एक हाती सत्ता आहे. या सत्तेला आता झालेल्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप आमदार राहुल कुल यांनी तगडे आव्हान दिले. तसेच या निवडणुकीत कुल यांनी मोठे यश मिळवले आहे. तसेच थोरातांची बाजार समिती या समिकरणाला छेद दिल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कुल यांच्याकडील भीमा पाटस कारखाना तीन हंगाम बंद होता. तो कारखाना आता सुरू झाला आहे. त्यामुळेच बाजार समितीत कुल यांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे. भीमा पाटस कारखान्यावर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आरोप केले होते. या कारखान्यात ५०० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप राऊतांनी आमदार कुल यांच्यावर केला होता. त्या पार्श्वभूमिवर वरवंड येथे महाविकास आघाडीतर्फे सभेचेही आोयजन केले होते. त्यावेळी राऊतांनी केलेल्या आरोपांना या निवडणुकीत मतदारांनी महत्व दिले नसल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीची (Daund Bazar Samiti) एकतर्फी वाटणारी निवडणूक अटीतटीची झाली. बाजार समितीतील माजी आमदार रमेश थोरात यांच्या एक हाती सत्तेला कुल यांनी प्रथमच सुरूंग लावला आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना राज्यात कोणी गांभीर्याने घेत नाही, असा आरोप आमदार कुल यांनी चार दिवसांपूर्वी केला होता. मात्र या निकालाने दौंडच्या मतदारांनीही राऊतांना गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून आले. कुल यांच्यावर ५०० कोटींचा गैरव्यवहारांचा कथित आरोप होऊनही मतदारांनी त्यांना कुल यांना पसंती दिली आहे.

दिवंगत आमदार सुभाष कुल व रमेश थोरात (Ramesh Thorat) यांची बाजार समितीवर पकड होती. सुभाष कुल यांचे निधन झाल्यानंतर आमदारकी कुल कुटुंबियांकडे राहिली, मात्र बाजार समितीवर थोरात यांनी कुलांना शिरकाव करू दिला नव्हता. २००६ च्या बाजार समितीच्या निवडणुकीत कुल यांच्या पॅनेलचा थोरात यांनी सुमारे ४०० मतांनी पराभव केला होता. बाजार समितीच्या २०१७ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व जागा जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघात राहुल कुल (Rahul Kul) यांचे समर्थक मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नसले तरी नऊ जागांवरील विजय हा त्यांच्यासाठी मोठे यश समजले जात आहे. त्यामुळे निकालानंतर त्यांनी तालुक्यात जल्लोष केला आहे. ही निवडणूक लढविण्यासाठी कुल साशंक होते. भाजपने ही निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेण्यासाठी कुल यांनी चौफुला येथे मेळावा घेतला होता. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भाजपने ही निवडणूक लढवली.

हा निकाल विधानसभा निवडणुकीत काठावर पास झालेल्या कुल यांना संजिवनी देणार ठरला आहे. या निकालाचा आगामी भीमा पाटस, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, राहुल कुल यांच्या विरोधकांनी अनेक निवडणुकांत भीमा पाटस हा प्रचाराचा प्रमुख मुद्दा केला होता. या एकाच कारणामुळे कुल यांना अनेकदा अपयशाला सोमोरे जावे लागले होते. मात्र कुल यांनी भाडेतत्वावर का होईना कारखाना चालू केल्याने सभासदांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर जुन्या संचालकांना उमेदवारी न देण्याचा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मतांचाही फटका राष्ट्रवादीला बसल्याचे जाणकारांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT