Ajit Pawar,Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar : इंग्रजांनीही विकास केला म्हणून लोक त्यांच्यासोबत गेले का? अजितदादांबाबत रोहित पवार असं का बोलले

Sunil Balasaheb Dhumal

Pune Political News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. अजित पवारांच्या माध्यमातून बारामतीचा विकास झाल्याने ते कामाची व्यक्ती असल्याचा प्रचार बारामती मतदारसंघात होत आहे. यावर रोहित पवारांनी ब्रिटिशांचा दाखला देत अजितदादांना लक्ष्य केले. ब्रिटिशांनी विकास केला म्हणून सामान्य जनता त्यांच्या मागे उभे राहणार का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला. त्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांची तुलना थेट ब्रिटिशांशी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पुण्यामध्ये प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, भाजपचे नेते शरद पवारांना राजकारणातून संपवण्याची भाषा करत आहे. पवार कुटुंबातील माणसे फोडून भाजपच हा कुटील डाव साधण्याचा प्रयत्न करत असून, जनतेला हे पटणार नाही. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे बारामतीतून तीन लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार (Ajit Pawar) हे विकास करणारे कामाची व्यक्ती आहे, असा प्रचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. याबाबत रोहित पवार म्हणाले, ⁠काम करताना विचार सोडला तर तो विकास होत नाही. विकास करताना तुम्ही फक्त स्वतःचेच घर भरत राहिला तर कसे होणार? त्यामुळे विकासाचा मुद्दा पुढे आणण्यापेक्षा विचार हा जास्त महत्त्वाचा आहे.

ब्रिटिश किती ताकदवान आहेत. त्यांची किती देशांमध्ये सत्ता आहे असे म्हणून ब्रिटिशांनी विकास केला. असे म्हणत सामान्य जनता ब्रिटिशांबरोबर गेली असती का? असा सवाल करत आज विचार जास्त महत्त्वाचा असल्याचे रोहित पवारांनी या वेळी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, ⁠ब्रिटिशांनी जी वृत्ती वापरून घर आणि माणसे फोडली, तीच वृत्ती आज वापरली जात आहे. विकासाचा विचार केला तर बारामतीमध्ये एमआयडीसी, पुण्यात आयटी आणि धरणे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे झाली आहेत. तरीदेखील विकासापेक्षा विचार अधिक जास्त म्हत्त्वाचा आहे.

अजित पवारांनी रोहित पवारांना बच्चा असा उल्लेख केला होता. त्यानंतर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीदेखील त्यांना बालवाडीचे अध्यक्ष अशी टीका केली आहे. त्यांनाही रोहित पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ⁠सिंचनाच्या चिखलात ते अडकले होते. एका घराच्या पत्त्यावर १०० कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्यानंतर भाजपसोबत जाऊन कारवाई थांबवली. असे करण्याएवढी बुद्धी माझ्याकडे नाही, त्यामुळे ते मला लहान समजत असतील, असा खोचक टोला रोहित यांनी अजित पवारांना लगावला.

सुनील तटकरे हे अंतुलेंचे कार्यकर्ते होते. नंतर त्यांनी त्यांना सोडले. अंतुलेंना सोडल्यानंतर ते शरद पवारांसोबत आले. आता त्यांनी शरद पवारांनाही सोडले आणि अजितदादांच्या गोटात गेले. वेळ आली की ते भविष्यात अजितदादांनाही सोडून भाजपत जातील. हे पाहता तटकरेंच्या एवढी बुद्धी माझ्यात नसल्याची टीकाही रोहित पवारांनी केली.

आंबेडकरांना आवाहन

भाजप नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे त्यांना फायदा होईल, अशी भूमिका आंबेडकर घेणार नाहीत. त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर ती कार्यकर्ते, जनतेला पटणार नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा विचार करून महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन रोहित पवारांनी केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT