<div class="paragraphs"><p>Sharad Pawar,&nbsp;Narendra Modi</p></div>

Sharad Pawar, Narendra Modi

 

sarkarnama

पुणे

चर्चा न करता कृषी कायदे करणं ही हुकुमशाहीच ; पवारांची मोदींवर टीका

सरकारनामा ब्युरो

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागे घेतलेल्या तीन कृषी कायद्यांवर राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी भाष्य केलं. ''केंद्र सरकारने तीन कायदे केले त्या कायद्यात काही गोष्टी व्यवस्थित होत्या तर काही अडचणी तयार करणाऱ्या होत्या. गडबडीने कायदे केले आणि मागेही घेतले, कायद्यांची चर्चा होण्याची गरज आहे, मात्र कायदे करताना त्यावर चर्चा करणार नसेल तर हुकुमशाही आहे,'' अशी टीका मोदी (Narendra Modi) यांचे नाव न घेता पवारांनी केली.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत राजगुरुनगर येथे शनिवारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. यावेळी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आणि खेडचे माजी आमदार स्व. साहेबराव सातकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, '' देशात आणि राज्यात शेतीकडे प्राधान्याने पाहायला पाहिजे. पुणे जिल्हा सहकारी बॅक शुन्य टक्के व्याजाने शेतक-यांना कर्ज देऊ शकते, तर इतर ठिकाणी अशा प्रकारे कर्ज देता येईल का, याचा विचार व्हायला पाहिजे,''

''देशातील अनेकांनी सहकार चळवळ उभारली, राज्यातील सहकारी चळवळीमध्ये साहेबराव सातकर यांचे मोठे योगदान आहे. साहेबराव बुट्टे-पाटलांनी शिक्षणाचं वैभव उभारलं. आज याचं रोपटं मोठं झालं, याच ठिकाणी शेतकऱ्यांचा मेळावा होत आहे,'' असे पवार यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, ''शेतीच्या सुलभतेबरोबर उद्योगांसाठी मोठं जाळं उभं राहिले. त्यामुळे ग्रामीण भागाचं अर्थकारण सुधारलं. भूमिपुत्रांना नोकरी मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहे. उद्योगांना अनुसरुन तरुणांनी शिक्षण घ्यायला पाहिजे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, ''सध्या हत्येच्या घटना वाढत आहे, या घटनांचा पुढील काळात बंदोबस्त केला जाईल. महिलांवर अत्याचार करणा-यांना शक्ती कायद्यात मृत्युदंडाची तरतुद आहे. सध्या अमली पदार्थ ड्रग्ज प्रकरणाचे प्रमाण वाढत आहे. महाविद्यालयीन तरुणांनी व पालकांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. चुकीच्या मार्गाने पैशा कमवता तर अनर्थ होणारच,''

राज्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. यावर खासदार डॅा. अमोल कोल्हे म्हणाले, ''बैलगाडा शर्यत हि पारंपारीक संस्कृती ,नाद, छंद न राहता पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी काम करावं लागणार आहे.,''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT