Srirang Barane and Anna Bansode
Srirang Barane and Anna Bansode Sarkarnama
पुणे

NDA Alliance : शपथविधीनंतर अवघ्या 24 तासांत `NDA`तील खदखद समोर? ; शिवसेनेचे बारणे अन् राष्ट्रवादीच्या बनसोडेंची नाराजी!

Uttam Kute

Modi 3.0 Cabinet : केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी झाला. मात्र, त्यानंतर २४ तासांतच सोमवारी (ता.१०) `एनडीए`तील खदखद समोर आली. मंत्रिपद देताना शिवसेनेला एक न्याय, तर दुसऱ्या पक्षाला एक असं झाल्याचं शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बाऱणे म्हणाले. तर,एकही मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाहीतर राज्यातील पक्षाचे सर्वच कार्यकर्ते नाराज झाल्याचे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले.

खरंतर संसदरत्नासह महासंसदरत्नाचे मानकरी आणि खासदारकीची हॅटट्रिक केलेले बारणे(Shrirang Barne) हे यावेळी केंद्रात मंत्रिपदासाठी मोठे दावेदार होते. सात खासदार असलेल्या त्यांच्या शिवसेना पक्षाने एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्याची मागणी केली होती. पण, त्यांना केवळ एक राज्यमंत्री पद आणि ते बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांना दिले गेले. त्यामुळे मंत्रिपदापासून पिंपरी-चिंचवड पुन्हा वंचित राहिले.परिणामी शहरवासियांमध्ये नाराजी पसरली.तशीच ती एकही मंत्रीपद न मिळालेल्या राष्ट्रवादीतही पसरली. त्यांचे उद्योगगरीतील आमदार बनसोडेंनी ती बोलून दाखवली,

भाजपचा तथा `एनडीए`तील जुना मित्र म्हणून एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदाची अपेक्षा होती,असे बारणे म्हणाले. पण, फक्त एकच राज्यमंत्रिपद दिले. तेथेही ३५ व्या नंबरवर शपथ घ्यावी लागली, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असते, तर समाधान वाटले असते,असे ते म्हणाले.

एनडीएतील चिराग पासवानांपेक्षा (५) शिवसेनेचे (७) खासदार जास्त निवडून येऊनही चिराग यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले आणि शिवसेनेला मात्र नाही,याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.अगदी एकच खासदार असलेले जितीन माझी यांनाही ते देण्यात आले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आपली नाराजी नाही, तर पक्षाला एका कॅबिनेटसह दोन मंत्रीपदे मिळावीत ही अपेक्षा आपले नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली असून ते ही भावना भाजप(BJP) वरिष्ठांच्या कानावर घालतील,असे बारणे म्हणाले.

भाजपने राज्यात 28 जागा लढवून नऊ जिंकल्या.तर, शिवसेनेने 15 लढवून 9 जागांवर विजय प्राप्त केला. आमचा विजयाचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा चांगला असल्याने कॅबिनेट मंत्रिपद मिळेल,असे वाटले होते,ते म्हणाले आणि म्हणून शिवसेनेबाबत न्याय भूमिका घेण्याची मागणी त्यांनी केली.

अजित पवारांनी(Ajit Pawar) भाजपसाठी खूप महत्वाची भूमिका या लोकसभा निवडणुकीत पार पाडली असल्याने त्यांनाही न्याय दिला पाहिजे होता,असे बारणे म्हणाले.तीनदा निवडून आलेले साताऱ्याचे भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांच्याबाबतीत सन्मानाची भूमिका घ्यावी,अशी महाराष्ट्राची भावना होती,असे भाष्य त्यांनाही न मिळालेल्या मंत्रिपदावर बारणेंनी केले. त्याचवेळी कुणाला मंत्री करायचे आणि कुणाला नाही, हा भाजपचा अंतर्गत विषय असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

चार महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक लक्षात घेता इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला जास्त झुकते माप केंद्रीय मंत्रिमंडळात मिळायला हवे होते,असे बनसोडे म्हणाले.आपल्या पक्षाला एकही मंत्रिपद न मिळाल्याने आपणच नाही तर राज्यातील पक्षाचे सर्वच कार्यकर्ते नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच याअगोदर पक्षाने केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद भूषविले असल्याने त्यानंतर आता राज्यमंत्री पद कसे घेणार अशी विचारणा त्यांनी केली.आगामी विधानसभेच्या दृष्टीने कॅबिनेट मंत्रीपद पक्षाला मिळायला पाहिजे होते,तसेच शिवसेनेलाही ते एक आणि एक राज्यमंत्री अशी दोन पदे द्यायला हवी होती,असे बनसोडे म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT