Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : काही जण म्हणतात ताबडतोब द्या; मराठा आरक्षणावर अजित पवारांनी मांडली बाजू

सरकारनामा ब्यरो

Baramati : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेत 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तीन कोटी मराठा बांधव मुंबईत येणार, असे देखील जरांगे यांनी सांगितले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता काही जण मुंबईत येण्याची भूमिका मांडत आहेत. मात्र, कायद्याच्या चौकटीत राहून आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

काहींचे म्हणणे आहे की ताबडतोब आरक्षण द्या. मात्र, ते न्यायालयात टिकले नाही तर लोकांचा विश्वास उडेल. म्हणून न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेत एकनाथ शिंदे (EKnath shinde ) यांनी आरक्षण देणार असल्याचे सांगितले आहे. एससी, एसटी, ओबीसी यांच्या कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार कार्यक्रमाला अजित पवार बारामतीमध्ये उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. मात्र, ते न्यायालयात टिकले नाही. पुढे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले ते उच्च न्यायालयात टिकले मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. सर्वांनीच प्रमाणिकपणे आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, असे अजित पवार म्हणाले.

न्यायालयाने क्युरेटिव्ह पिटीशन ऐकण्यासाठी जानेवारीतील तारीख दिली आहे. न्यायालयाने आरक्षण का नाकारले त्या सगळ्याचा अभ्यास करून वकिलांची फौज न्यायालयात आपली बाजू मांडेल. मात्र,आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मागासवर्ग आयोगाला अभ्यास करावा लागेल. कोण गरीब आहे याची माहिती गोळा करावी लागले. आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार मनापासून प्रयत्न करत आहे, असे आश्वासन देखील पवार यांनी दिले.

...म्हणून मराठवाड्यात प्रमाण कमी

विदर्भात सगळ्यांकडे पाटील असो वा देशमुख यांना पंजाबराव देशमुख यांच्या प्रयत्नामुळे कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र मिळते आहे. पश्चिम महाराष्ट्रात प्रमाण कमी आहे. मात्र, मराठवाड्यात निजामशाहीचा काळ होता त्यामुळे तिथे तेवढे प्रमाण नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश देऊन नोंदी तपासण्याचे काम सुरू केले आहे, असे सांगत दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही तर लोकांच्या नेत्यांवरील विश्वास उडेल. त्यामुळे महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे अजित पवार म्हणाले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT