Supriya Sule, Ajit Pawar
Supriya Sule, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Supriya Sule News : आता त्यांना लाडकी बहीण, भाऊ सगळे आठवतील; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Sudesh Mitkar

Pune News : राज्य सरकारकडून नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी या घोषणा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केल्या असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत मत व्यक्त केले आहे.

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सदानंद सुळे यांच्या समवेत रविवारी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 'मंगलमय वातावरणामध्ये पालखीचे पुण्यात आगमन होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला बळीराजाला न्याय मिळू दे', असं साकडं विठुरायाला घातल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. (Supriya Sule News)

सरकारने वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असून मुख्य पालख्यांना 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याची देखील घोषणा केली. बाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे हे आता सरकार काय काय घोषणा करेल आणि जुमलेबाजी करताना पाहायला मिळेल.

निवडणुका आल्यामुळे सध्या त्यांना लाडकी बहीण-भाऊ हे सगळे आठवू लागले आहेत. उशीरा का होईना सरकारला जाग आली. मात्र, या योजनेमध्ये खूप सार्‍या त्रुटी राहिल्या आहेत. त्याचा अभ्यास आम्ही करत आहोत. परत याबाबतची भूमिका आम्ही स्पष्ट करू. जुमलांचा पाऊस हा बजेटमधून अपेक्षितच होता. त्यामुळे वेगळं काही या बजेटबाबत वाटत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीनंतर बीड येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून दोन गटांमधील संघर्ष वाढला आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, एक ते सव्वा वर्षापासून मी गृहमंत्रालयाच्या कारभारावरती बोलत आहे. पोलिसांवरती माझं प्रचंड प्रेम आदर आणि विश्वास आहे. मात्र, गृहमंत्रालयाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील क्राइम रेट वाढला असून त्यावर ती गृह मंत्रालयाचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे सबंध महाराष्ट्रभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सातत्याने आवाज उठवत असून याबाबत केंद्र सरकारकडे देखील त्यांनी मदत मागितली आहे. त्यांच्यासोबत तर इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबतचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT