Prakash Ambedkar, Sushma Andhare sarkarnama
पुणे

Sushma Andhare on Prakash Ambedkar : संजय राऊत आमच्यासाठी चिलखत; सुषमा अंधारेंची आंबेडकरांवर प्रश्नांची सरबत्ती...

Umesh Bambare-Patil

Shivsena News : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. या टीकेवरून सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारत सडेतोड टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत असून, आम्ही शंभर पावलं पुढे चाललोय. पण, तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा, असा टोलाही त्यांनी आंबेडकरांना लगावला.

राज्यातील महाविकास आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामधील चर्चा जवळपास फिस्कटल्याचं चित्र आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकरांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता सुषमा अंधारे यांनी प्रश्न विचारत टीका केली आहे. अंधारे म्हणाल्या, संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत असून, आम्ही 100 पाऊलं पुढे चाललोय, पण तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुषमा अंधारेंनी प्रकाश आंबेडकरांना काही प्रश्न विचारले आहेत. यामध्ये त्या म्हणतात की, मुंबईत सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही? काँग्रेसशी पटत नाही, पण त्यांना तुम्ही बोलावलं. आम्ही आधी चार, मग पाच जागा वंचितला दिल्या होत्या. आम्ही शंभर पावलं चाललो, तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती, असा प्रश्न त्यांनी आंबेडकरांना केला आहे.

ठाण्यात दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॉर्म भरावा, ठाण्याची जागा आम्हीच निवडून आणू, असं सुषमा अंधारे यांनी खुलं आव्हान भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला दिलं. स्मृती इराणी, कंगना रनाैत, नवनीत राणा हे चित्रपट क्षेत्रातून आलेत, त्यामुळे व्यवसायावरून कोणी कोणावर टीका करू नये, असं त्या म्हणाल्या. अजित पवार यांनी शोध घ्यावा की विजय शिवतारे यांचा स्क्रिप्ट रायटर कोण आहे. विजय शिवतारे यांचे स्क्रिप्ट रायटर अजित पवारांच्या आजूबाजूला बसलेले आहेत का हे पाहावं. आता विजय शिवतारे यांचा यू टर्न म्हणजे "तारे जमीन पर" अशातला प्रकार आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते...?

या देशात असलेली दळभद्री सरकारकडून हुकूमशाही सुरू असून भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही एक लढाई करतोय. त्यात बाळासाहेब आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होऊ शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही तर आंबेडकरांची आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो. भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल, अशा प्रकारचं कोणतंही पाऊल आंबेडकर उचलणार नाहीत. आंबेडकर यांचे विचार आणि आमचे एक आहेत पक्के आहेत.

आंबेडकर काय म्हणाले होते...

संजय, किती खोटं बोलणार, तुमचे आणि आमचे विचार एकच आहेत, तर आम्हाला बैठकीला का बोलवत नाही. सहा मार्चला फोर सीझन्स हॉटेलातल्या बैठकीसाठी आमच्या प्रतिनिधींना का आमंत्रण आलं नाही. आजही वंचितला आमंत्रणाशिवाय कशी काय बैठक घेता. तुमचे आम्ही सहकारी, तरी पाठीत खंजीर मारण्याचं काम केलंत. सिल्व्हर ओकवरील बैठकीत तुमची काय वागणूक होती? अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार देण्याचं आपण बोललात हे खरं नाही का. एकीकडे आघाडीचा भ्रम, दुसरीकडे आम्हालाच पाडण्याचा कट रचता, असे प्रश्न त्यांनी केले होते.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT