Pune News : वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. वैष्णवीच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी तिच्या मृत्यूला जबाबदार धरत हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, वैष्णवीचा विवाह हा हगवणे कुटुंबीयांनी केवळ आर्थिक स्वार्थासाठी लावून दिला आणि लग्नानंतर तिचा मानसिक आणि आर्थिक छळ सुरू झाला होता.
वैष्णवी आणि शशांकने विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी हगवणे कुटुंबीयांची आसपास विचारपूस करत माहिती काढली. त्यामध्ये हगवणे कुटुंबाची वादग्रस्त पार्श्वभूमी कस्पटे यांच्यासमोर आली होती. मोठ्या सुनेबरोबर झालेले प्रकारही त्यांना कळाले होते. त्यामुळे त्यांनी लग्नाला नकार दिला होता. मात्र त्यानंतर वैष्णवीने शशांकसोबत लग्न करण्याचा हट्ट धरला होता.
शशांक हगवणे यानेही वैष्णवीला आलेल्या दोन स्थळांना फोन करून धमकावलं होतं. अखेर मुलीच्या हट्टापुढे बापाने लग्न करून द्यायचा निर्णय घेतला. मात्र हगवणे कुटुंबीयानी वैष्णवीला पैशाच्या हव्यासापोटी जाळ्यात ओढले असल्याचे लग्नाच्या दिवशीच स्पष्ट झालं होतं.
वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी तिच्या लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च केला होता. पुण्यातील सुसगावमध्ये एक नामांकित रिसॉर्ट बुक करून 5000 पाहुण्यांसाठी भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.
एका व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार रुपये याप्रमाणे फक्त जेवणाचा खर्च पन्नास लाखाच्या घरात पोचला होता. लग्नातील उंची कपडे, पाहुण्यांच्या स्वागताचा थाट, येणाऱ्या बड्या नेत्यांचा सत्कार यावरच लाखो रुपये खर्च झाले. या सगळ्या इव्हेंटची जबाबदारी एका नामांकित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आली होती. अशाप्रकारे फक्त एका दिवसाच्या लग्नासाठी तब्बल दीड कोटी रुपये अनिल कस्पटे यांनी खर्च केले होते.
वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह 28 एप्रिल 2023 ला झालं. मात्र या लग्नात हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या वडिलांना पाण्यासारखा पैसा ओतायला लावला. शशांक हगवणेचे वडील राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील मोठे नेते होते. त्यामुळे आपल्या प्रतिष्ठेला साजेसं लग्न झालं पाहिजे, ही पहिली अट हगवणे कुटुंबीयांनी घातली होती.
आपल्या मुलीच्या चेहऱ्यावर हसू पाहून अनिल कासप्टे यांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न करायचं ठरवलं होतं. त्यामुळे लेकीच्या लग्नात काहीच कमी पडू द्यायचं नाही हे वैष्णवीच्या वडिलांचं सुद्धा स्वप्न होतं. मात्र हगवणे कुटुंबीयांनी त्यांची हद्द पार केली. हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांकडून हुंड्याच्या स्वरूपात 51 तोळे सोने, 1 फॉर्च्युनर कार, चांदीची भांडी सुद्धा हपडली होती.
इतकं सगळं करून सुद्धा लग्नाच्या नंतर काही महिन्यातच वैष्णवीचा छळ सुरू झाला. कधी चारित्र्यावर संशय तर कधी वडिलांकडून वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक मागणी. हा छळ सुरू असताना वैष्णवीकडे आपल्या वडिलांकडून 2 कोटी रुपये आणण्याचा हट्ट धरला होता. मात्र वडिलांना अजून किती त्रास द्यायचा यामुळे वैष्णवीने त्यास साफ नकार दिला होता. वैष्णवीच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, दोन कोटी रुपयांची मागणी नाकारल्यानंतर तिचा छळ वाढत गेला आणि अखेर नऊ महिन्यांच्या मुलाला मागे ठेवून तिने टोकाचं पाऊल उचललं.
* वैष्णवीच्या लग्नासाठी तब्ब्ल दहा लाख रुपये भाडे असलेले आलिशान रिसॉर्ट भाड्याने घ्यायला लावले .
* लग्नाच्या स्टेजच्या सजावटीवर बावीस लाख रुपये खर्च करायला लावले .
* पाच हजार जणांना लग्नासाठी आमंत्रण देण्यात आलं होतं . एक व्यक्तीच्या जेवणासाठी एक हजार याप्रमाणे पन्नास लाख जेवणावर खर्च करायला लावले .
* पाहुण्यांचे सत्कार - स्वागत आणि कपड्यांवर खर्च करायला लावला .
* लग्नाचे कंत्राट इव्हेन्ट म्यानेजमेंट कंपनीला द्यायला लावले आणि त्याचे लाखो रुपये वैष्णवीच्या वडिलांना भरायला लावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.