Amol Kolhe-Vilas Lande
Amol Kolhe-Vilas Lande Sarkarnama
पुणे

NCP NEWS : शिरूर लोकसभेसाठी लांडेंनी दंड थोपटले; डॉ. कोल्हे म्हणतात, ‘शर्यत अजून संपलेली नाही...’

सरकारनाम ब्यूरो

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या उमेदवारीवरून पुन्हा चर्चेत आला आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी या लोकसभेसाठी पुन्हा दंड थोपटले आहेत. ‘शिरूर लोकसभेची निवडणूक मी लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे,’ असे सांगून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला आहे. दुसरीकडे, विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शर्यत अजून संपलेली नाही; कारण मी अजून जिंकलेलो नाही’ असे स्पष्ट करत निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच सुरू झाला आहे. (Vilas Lande aspirant for Lok Sabha from Shirur Constituency)

राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) गेल्या दोन दिवसांत नऊ लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीतील इच्छुकांची नावे समोर यायला सुरुवात झाली आहे. भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या ‘फ्लेक्स’वर ‘भावी खासदार विलास लांडे’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे लांडे यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचे स्पष्ट होते.

शिरूर लोकसभेची निवडणूक मी लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, पक्षश्रेष्ठी जो उमदेवार देतील, त्याच्यासाठी काम करणार, असे सांगून माजी आमदार विलास लांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोण निवडणूक लढविणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे. २००९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती.

विलास लांडे यांची उमेदवारीची इच्छा आणि निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, माजी आमदार विलास लांडे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे मला माध्यमातून समजलं. माझी त्यांच्याशी या विषयावर चर्चा झालेली नाही. पण महत्वकांक्षा असणे अजिबात गैर नाही. त्यामुळे लांडे यांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा. पण शर्यत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाही.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादांनी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विश्वास दाखवला. तो विश्वास सार्थ ठरविताना बैलगाडा शर्यत, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. नॅशनल हायवेच्या माध्यामतून ३० हजार कोटी रुपयांचे प्रोजेक्ट या मतदारसंघात आले आहेत. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाला मंजुरी आणलेली आहे. नजीकच्या काळात हा रेल्वेमार्ग मार्गी लावणे आणि इंद्रायणी मेडीसिटीसारखा प्रकल्प अस्तित्वात आणणे हे माझे उद्दिष्ट असणार आहे. रिले शर्यतीप्रमाणे बॅटन देण्यापूर्वी आपण आपली रेष गाठायची असते, त्यामुळे जनतेचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझे काम चालत राहणार आहे, असेही खासदार कोल्हे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT