Rajgurunagar Cooperative Bank Latest News
Rajgurunagar Cooperative Bank Latest News Sarkarnama
पुणे

काय सांगता! १३ हजारांचे व्याज वेळेत न दिल्याने बॅंकेला झाला चार लाखांचा दंड

उत्तम कुटे

पिंपरी : पुण्यातील रुपी को-ऑपरेटीव्ह बॅंकेनंतर पिंपरी-चिंचवडमधील सेवाविकास को-ऑपरेटीव्ह बॅंकेचाही परवाना रिझर्व बॅंकेने नुकताच रद्द केला. त्यानंतर आता (ता.१७ ऑक्टोबर) रिझर्व बॅंकेने पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राजगुरुनगर सहकारी बॅंकेला आपल्या कारवाईचा मोठा हिसका दाखवला आहे. मयत करंट खातेधारकांच्या ठेवींवरील बारा हजार नऊशे रुपयांचे व्याज त्यांच्या वारसांना वेळेत न दिल्याने रिझर्व बॅंकेने राजगुरुनगर बॅंकेला चार लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Rajgurunagar Cooperative Bank Latest News)

१७ शाखा, दीड हजार कोटी रुपयांच्या ठेवी आणि गत आर्थिक वर्षात ३६ कोटी रुपयांचा नफा कमावून दहा टक्के लाभांश दिलेल्या राजगुरुनगर बॅंकेच्या संचालक मंडळाची निवडणूक पंधरवड्यावर (६ नोव्हेंबर) आली असताना ही कारवाई झाल्याने राजगुरुनगरच (ता.खेड) नाही, तर जिल्ह्यातही मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ही कारवाई हा प्रचाराचा मुद्दा म्हणून विद्यमान संचालकांच्या भीमाशंकर सहकाही पॅनेलचे प्रतिस्पर्धी असलेले राजगुरुनगर सहकारी परिवर्तन पॅनेल बनविण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे वेळेत न दिलेल्या व्याज रकमेच्या तुलनेत दंडाची रक्कम ही अवाजवी असल्याने त्याविरोधात रिझर्व बॅंकेकडेच दाद मागणार असल्याचे राजगुरुनगर बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळूंज यांनी 'सरकारनामा'ला आज सांगितले.

मयत १६ प्रोपाय़टरांच्या करंट तथा चालू खात्यावरील बारा हजार नऊशे रुपयांचे व्याज त्यांच्या निधनाबाबत वेळीच माहिती न मिळाल्याने राजगुरुनगर बॅंकेकडून त्यांच्या खात्यावर जमा करण्याचे म्हणजेच त्यांच्या वारसदारांना देण्याचे राहून गेले होते. हे रिझर्व बॅंकेच्या तपासणीत दिसून आले. म्हणून रिझर्व बॅंकेने राजगुरुनगर बॅंकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याचे उत्तर समाधानकारक न वाटल्याने त्यांनी चार लाख रुपयांचा मोठा दंड ठोठावला. रिझर्व बॅंकेचे मुख्य महाव्यवस्थापक योगेश दयाल यांनी तो केला आहे.त्यांनीच सेवाविकास बॅंकेचा परवाना रद्द करण्याचा आदेश जारी केला होता.

ठेवीवरील व्याजाबाबत रिझर्व बॅंकेच्या नियमाची पायमल्ली केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. चालू खातेधारक म्हणजे ठेवीदारांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी क्लेम करेपर्यंत मृत खातेधारकांच्या बॅंकेत पडून असलेल्या ठेवींवर व्याज द्यावे लागते, असा नियम आहे. मात्र, या मृत करंट खातेधारकांच्या निधनाबाबत बॅंकेला लगेच कळविण्यात आले नाही. परिणामी वेळेत त्यांच्या ठेवींवर व्याज जमा करता आले नसल्याचा खुलासा राजगुरूनगर बॅंकेच्या वतीने वाळूंज यांनी केला. मात्र, क्लेम येताच सबंधित सर्व मृत खातेधारकांच्या वारसांना व्याजासह ठेवी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ही तांत्रिक चूक कार्यालयीन पातळीवर झाली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT