Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
पुणे

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना केलेल्या फोनबाबत पंकजा मुंडेंनी सोडलं मौन; म्हणाल्या...

सरकारनामा ब्यूरो

Kasba By Election : सध्या कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु आहे. तर या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

याच पार्श्वभूमीवर आज कसबा मतदारसंघात हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी रोड-शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा विजय निश्चित होईल, असा विश्वास भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

तसेच उद्धव ठाकरेंनी पक्षाचं नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर पंकजा मुंडेंनी त्यांना फोन करुन विचारपूस केली होती. या फोन प्रकरणावरुन वेगवेगळ्या चर्चेला तोंड फुटले होते. तर दोघांमध्ये नक्की काय बोलणं झालं? याबाबत सांगण्यात त्यांनी नकार दिला होता. पण आज त्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीसाठी त्या आज प्रचारात सामिल झाल्या होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, ''मागील तीन दिवसांपासून मी पुण्यात मुक्काम ठोकून आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मी प्रचार करत आहे. ज्यांना माझा प्रचार पाहवत नाही ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत. मी करत असलेला प्रचार ज्यांना आवडत नाही, तेच अशा प्रकारच्या बातम्या करत आहेत'', असं त्या म्हणाल्या.

तसेच गिरीश बापट हे आजारी असतानाही प्रचारसभेत सहभागी झाले होते. याबाबत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ''भाजपच्या जन्मापासून गिरीश बापट भाजपसोबत आहेत. आजवर त्यांनी पक्षासोबत काम केल, तसेच विधानसभेत आणि लोकसभेत काम केलं आहे.

एवढं आयुष्य पक्षासाठी वेचल्यानंतर निवडणुकीत भाग घेण्याची उत्सुकता त्यांनाही असेल. हेमंत रासनेंना आशीर्वाद देण्याची त्यांचीही इच्छा असेल, त्यामुळे ते सहभागी झाले असतील तर त्यात वावगं काय आहे '', असं त्या म्हणाल्या.

''भारतीय जनता पक्षात दिग्गज आहेत. परंतु आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी आलो आहोत. हेमंत रासने यांना विजयी करण्यासाठी भाजपला विजयी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आलोत.

कसबाच नाही तर प्रत्येक निवडणुकीकडे आम्ही चुरशीची निवडणूक म्हणूनच पाहतो. या निवडणुकीत आम्हाला जास्तीत जास्त मते घ्यायची आहेत. निवडणूक चुरशीची जरी असली तरी आम्हाला विजयाबद्दल अजिबात शंका नाही. जास्तीत जास्त मते घेऊनच आम्हाला विजयी व्हायचे आहे'', असंही त्या म्हणाल्या.

''अजित पवार हे त्यांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत. त्यामुळे आपल्या उमेदवाराचा प्रचार ते चांगल्या प्रकारेच करणार. पण आमचा आत्मविश्वास अतिशय दांडगा आहे. परिस्थिती अतिशय सकारात्मक आहे.

सरकार आमचं आहे. लोक देखील विजयाकडे वाटचाल करणारी आहेत. आपल्याला विकास मिळेल या भावनेतून लोक देखील आम्हाला निवडून देतील. राज्यातली सत्ता आणि स्थानिक सत्ता जेव्हा एकत्र मिळून काम करतात तेव्हा विकास हा नक्कीच होत असतो'', असं म्हणत त्यांनी भाजपच्याच उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला.

''पदवीधर निवडणुकीतील निकालाबाबत बोलताना त्या म्हणाल्या,''पदवीधर निवडणुकीतील निकाल निराशाजनक होता. त्यामुळे आता आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागली आहेत. कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच अशी भावना आता कार्यकर्त्यांच्या मनात आहेत'', असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, आज कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील बैठकांचे सत्र हाती घेतले असून या पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT