Uddhav Thackeray and Chandrashekhar Bawankule  Sarkarnama
पुणे

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे मराठा आंदोलकांना का भेटले नाहीत? बावनकुळेंनी सांगितलं कारण

Sudesh Mitkar

Pune News, 30 July : मराठा आरक्षणाविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, याबाबतचे निवेदन देण्यासाठी मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) भेटीला गेले असता ते आंदोलकांची भेट न घेताच निघून गेले.

यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज मंगळवारी (ता. 30 जुलै) उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन केले. या आंदोलकांना भाजपनेच पाठवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांची भेट का घेतली नाही याचं कारण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मराठा शिष्टमंडळ भेटायला गेले होते. भाजपला आंदोलक पाठवण्याची गरज पडत नाही. कोणत्या पक्षाचे, कोणत्या घटकाचे याचा विचार न करता उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलकांना तत्काळ भेटायला हवं होतं.

ते आंदोलकांना भेटले नाहीत, याचे कारण स्पष्ट आहे. कारण उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) खरे मारेकरी आहेत. ठाकरेंच्या सरकारने मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण ज्या पद्धतीने मांडायला हवे होते, ते मांडले गेले नाही. सुप्रीम कोर्टात अंतिम केस सुरू असताना ठाकरे सरकार झोपलं होतं.

दोन चांगले वकील दिले असते, चांगल्या पद्धतीने बाजू कोर्टात मांडली असती तर आरक्षण गेलं नसतं, जे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत, ते लोकांना का भेटतील? असा सवाल बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांना आंदोलकांना भेटायला नाक राहिलेलं नाही.उद्धव ठाकरे कधीही मराठा आरक्षणाच्या बाजूने नव्हते, राहणारही नाहीत. त्यांना काही देणंघेणं नाही, त्यांनी मराठा आंदोलकांची अवहेलना केली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार? याबाबत प्रश्न विचारला असता बावनकुळे म्हणाले, सावरकरांचा मुद्दा घेऊन भाजप निवडणूक लढेल, हा का विचार करता? सावरकरांचा मुद्दा आमच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाही. डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला कसं न्याय देऊ शकते, हे आम्ही लोकांना सांगणार आहोत, हा आमचा मुद्दा आहे.

इंडीया आघाडीचा खोटारडेपणा आम्ही उघड पाडणार आहोत. आमच्या जवळ कामाची शिदोरी आहे तर त्यांच्याजवळ फेक नरेटिव्ह आहे. आम्ही योजना आणि विकासाच्या माध्यमातून मते मागू महाविकास आघाडीला मत म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचं नुकसान करणार असल्याचंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

सरकारी जाहिरातीवर होत असलेल्या वारेमाप खर्चाबाबत विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना 700 कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले. आता सरकार काही जे घटक असताना त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी जाहिराती करत आहेत. मोठ्या योजनांच्या जाहिराती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी केल्या जातात, असं त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT