8 th October in History Sarkarnama
विशेष

8th October in History - अखेर भारतीय राजकारणातल्या ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्वाची 'एक्झिट'

Rashmi Mane

१९७९ सालचा ८ ऑक्टोबरचा तो दिवस भारतीय राजकारण आणि समाजकारणाच्या दृष्टीने दुर्दैवाचा होता. भारतातील एक समाजवादी राजकीय धुरीण व सर्वोदय कार्यकर्ते जयप्रकाश नारायण यांचे या दिवशी निधन झाले. १९९९ मध्ये जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता.

जयप्रकाश नारायण यांचे नांव समोर आले की आठवण होते आणिबाणीच्या दिवसांची. २५ जून १९७५ पासून देशात आणीबाणी जाहीर झाली. त्यानंतर आणिबाणीच्या विरोधात शक्ती एकवटण्याचे काम जयप्रकाश नारायण यांनी केले. या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना स्थानबद्ध केले.

स्थानबद्धतेत असताना जयप्रकाश नारायण यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुक्त करण्यात आले. पण त्यानंतर त्यांची प्रकृती खालावतच गेली. आणीबाणी व्यतिरिक्त जयप्रकाश नारायण यांचे भारतीय समाजकारणातही मोठे योगदान होते. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातही ते सक्रीय सहभागी होते.

जाणून घेऊ त्यांच्या आयुष्याविषयी

जन्म - ११ ऑक्टोबर,१०९२

शिक्षण - अमेरिकेतून एम.ए. पदवी

विचारधारा - मार्क्सवादी आणि गांधीवादी

१९१२९ मध्ये ते काँग्रेसशी जोडले गेले. १९३२ मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीतल्या सहभागाबद्दल त्यांना एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. १९३९ मध्ये ब्रिटनच्या बाजूने भारतीयांनी दुसऱ्या महायुद्धात सहभाग घ्यायला त्यांनी विरोध दर्शवला. त्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला.

१९३४ मध्ये त्यांनी काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. 1948 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडली आणि काँग्रेसच्या विरोधात मोहिम सुरु केली. १९५२ मध्ये त्यांन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९५२ मध्ये त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला वाहून घेतले.

8 October 2024 dinvishesh

१९६० मध्ये नवी दिल्ली येथे त्यांनी तिबेटच्या प्रश्नांवर आफ्रो-आशियाई परिषद भरविली १९६२ मध्ये पाकिस्तानबरोबर पुन्हा स्नेहसंबंध निर्माण व्हावा, या उद्देशाने ‘पाकिस्तान रिकन्सिलिएशन ग्रुप’ स्थापन केला नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सरकारने नेमलेल्या शांतता मंडळाचे ते सदस्य होते. जयप्रकाश नारायण यांच्या प्रयत्नाने १९६४ मध्ये भारत सरकार व नागा बंडखोर पुढारी यांच्यात युद्धविराम तहावर सह्या झाल्या. १९६५ मध्ये त्यांना शांतता कार्याबद्दल रेमन मागसाय हा आंतरराष्ट्रीयपुरस्कार मिळाला. १९७० मध्ये त्यांनी बिहारच्या मुझफरपूर जिल्ह्यात दौरा काढून तेथील नक्षलवाद्यांचे हृदयपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

‘असोशिएशन ऑफ व्हॉलंटरी एजन्सीज फॉर रूरल डेव्हलपमेंट’, ‘गांधीयन इन्स्टिट्यूट ऑफ स्टडीज’आणि‘अखिल भारतीय पंचायत परिषद’ या संस्थांचे ते अध्यक्ष किंवा मानसेवी संचालक होते.मे १९७२ मध्ये मध्यप्रदेशातील २६७ अट्टल दरोडेखोरांनी जयप्रकाशांच्या विनंतीवरून भारत सरकार व मध्य प्रदेश सरकार यांच्या पुढे शरणागती पत्करली होती.

१९७४ मध्ये त्यांनी देशातल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात संपूर्ण क्रांतीची कल्पना मांडली आणि पुढचे आयुष्य त्याला वाहून घेतले. आणिबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षाची प्रेरणाही जयप्रकाश नारायण यांचीच होती. दुर्दैवाने अंतर्गत मतभेदांमुळे जनता सरकार फार काळ टिकू शकले नाही.

८ ऑक्टोबर, १९७९ मध्ये अखेर हृदयविकार आणि मधुमेह यामुळे जयप्रकाश नारायण यांचे पाटण्यात निधन झाले.

दिनविशेष - 8 ऑक्‍टोबर

भारतीय वायुसेना दिन

1844 - काँग्रेसचे एक संस्थापक, नामवंत कायदेपंडित बॅ. बद्रुद्दीन तय्यबजी यांचा जन्म.

1905 - पुण्यात विलायती कपड्यांची होळी. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी झालेला हा या प्रकाराचा पहिला प्रयत्न होता.

1996 - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, स्वातंत्र्यसैनिक आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गोदावरी परुळेकर यांचे निधन. महाराष्ट्रातील स्त्री वकील म्हणून त्यांनी पहिली सनद मिळविली. तलासरी, डहाणू, शिरगाव आणि डोंगरदऱ्यातील गावांत हिंडून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमध्ये जागृती करण्याचे कार्य केले. "जेव्हा माणूस जागा होतो' हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करून देणारे आहे.

1998 - कोकणच्या "मदर तेरेसा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि देवरुख येथील प्रसिद्ध "मातृमंदिर' च्या संस्थापिका इंदिराबाई ऊर्फ मावशी हळबे यांचे निधन.

2003 - अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एंजल आणि इंलंडचे क्‍लाइव्ह ग्रेंजर यांना आर्थिक क्षेत्रातील नोबेल पारितोषक जाहीर. "रॉयल स्वीडिश ऍकॅडेमी ऑफ सायन्सेस'ने ही घोषणा केली. आर्थिक विकासाशी संबंधित "टाइम-व्हेरिइंग व्होलॅटिलिटी अँड नॉन-स्टेशनॅरिटी' या संकल्पनांवर दोघांचे संशोधन आधारित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT