Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde
Ajit Pawar-Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
विशेष

बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, हे अजितदादांनी सडेतोड शब्दांत सांगितलं!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : दिल्लीवारी (Delhi) केल्याशिवाय तसेच दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मंत्रिमंडळाचा विस्तार (cabinet expansion) करता येत नाही, हे या दोघांच्या वारंवार होणाऱ्या दिल्लीवारीमागचे साधंसरळ गणित आहे. राज्यात घडलेल्या गोष्टी ते दोघे तेथे सांगतील. आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. मधल्या काळात माझ्या कानावर आलं होतं की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा निर्णय होईल. त्यामुळे दिल्लीतून सिग्नल मिळाला की मग मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, अशा शब्दांत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले. (Ajit Pawar clearly stated when cabinet expansion will take place)

पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, उपराष्ट्रपतीपदाची आज निवडणूक होत आहे. मधल्या काळात माझ्या कानावर आलं होतं की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा निर्णय होईल. दिल्लीतून सिग्नल मिळाला की मग मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल. पण, त्यात दुसरं असंही ऐकायला मिळतंय की सर्वोच्च न्यायालयात जो विषय सध्या आहे. त्याबाबतची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी काही मत व्यक्त केलं आहे. त्यामुळेही काहीजण म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या प्रकरणांचा निकाल लागावा. मगच पुढच्या सर्व गोष्टी घडाव्यात, असंही ऐकायला मिळतंय.

दरम्यान, मुख्यमंंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्रीपदाची देवेंद्र फडणवीस यांना शपथ देण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोघांनी राज्यपालांना ‘या आमदारांना आम्हाला मंत्री आणि राज्यमंत्री करायचं आहे,’ अशी यादी दिली, तर राज्यपाल त्यांना मंत्रिपदाची शपथ देऊ शकतात, असे माझे स्वतःचे मत आहे, असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीवरही अजित पवार यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले. भंडारा आणि मावळ तालुक्यातील अत्याचाराचा घटनांचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारला. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलिस खात्याचा जो दरारा, दबदबा असला पाहिजे, प्रशासनावर मंत्रिमंडळाची हुकमत असली पाहिजे. तीच नसल्यामुळे सध्या अशा प्रकारच्या गोष्टींना महाराष्ट्रातील निष्पाप लोकांना सामोरे जावे लागत आहे, असा आरोपही विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT