Mahavikas Aghadi Vs Mahayuti  Sarkarnama
विशेष

Assembly Election Surve : राज्यातील पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे काय सांगतात; कोणाला बसणार धक्का ?

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी मोठा धक्का दिला. त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुती सरकारने रणनीती बदलली आहे. गेल्या महिनाभरापासून नव्या योजनांचा धडाका लावत राज्यातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

लोकसभेचा निकाल पहिला तर राज्यातील 155 जागांवर मविआने (MVA) मोठी आघाडी घेतली आहे. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाने अंतर्गत सर्व्हे केले असून त्या जोरावर जागावाटपात दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत आहे. (Assembly Election Surve news)

राज्यातील महायुतीला सत्ता सोडावी लागणार असे सर्व्हे पुढे येत असताना नुकताच भाजपने (BJP) केलेला सर्व्हे काहीसा दिलासा मिळाला आहे. भाजपकडून काही दिवसापूर्वी केलेल्या सर्व्हेनुसार भाजपला 70 जागा मिळतील तर शिवसेना शिंदे गटाला 45 जागा तर अजित पवार गटाला 35 जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्व्हेनुसार महायुतीला 150 जागा म्हणजेच बहुमत मिळेल असा दावा केला आहे.

दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी करताना महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपावरून जोरदार चुरस दिसत आहे. आघडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सर्वाधिक जागा कोणाला मिळणार यावरून चुरस आहे.

त्यामुळेच तीनही पक्षाने सर्व्हे करून घेतले आहेत. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमुळे शिवसेना ठाकरे गट बॅकफूटवर जाणार आहे. त्यामुळे विधानसभेला सर्वाधिक जागा लढण्याची रणनीती काँग्रेसने आखली असल्याचे समजते.

काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे. त्यानुसार काँग्रेसला 80 जागा मिळतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 60 ते 65 जागा तर उद्धव ठाकरे गटाला 35 ते 40 जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला राज्यात जवळपास 175 -180 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे.

महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने केलेल्या सर्वेमध्ये शिवसेना ठाकरे गटाला 70 जागा तर काँग्रेसला 60 जागा आणि शरद पवार गटाला 50 ते 55 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. या सर्व्हेनुसार आघाडीला 180 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळेच शिवसेनकडून मुख्यमंत्री पदावर आतापासूनच दावा सांगितला जात आहे.

हा सर्व्हे पाहता प्रत्यक्ष निकाल व सर्व्हे यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनता कोणाच्या पारड्यात बहुमत टाकणार हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याची वाट पाहावी लागणार, हे मात्र नक्की आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT