Maharashtra Election Survey  Sarkarnama
विशेष

Vidhansabha Election survey : राज्यात विधानसभा निवडणुका आता झाल्यास कोणत्या पक्षाला मिळणार किती जागा? सर्वांत मोठा सर्व्हे आला समोर

Sachin Waghmare

Vidhansabha Eletion News : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. येत्या काळात कोणत्याही क्षणी निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यातच निवडणूक आयोगाने दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही.

राज्यातील निवडणूक दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तत्पूर्वी राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मते मिळतील, याबाबतचा नवा सर्व्हे समोर आला आहे. (Vidhansabha Election survey News)

आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडी (MVA), महायुती, मनसे (MNS) आणि तिसरी आघाडीही उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे सर्व पक्ष निवडणूक लढविणार असल्याने मतविभाजनाचा फटका कोणाला ? बसणार याची उत्सुकता लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते तर महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार असली तरी राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून महायुतीच्या विरोधात आहे, त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच इंडिया टुडे-सी व्होटर्सच्या 'मुड ऑफ नेशन' सर्व्हेनुसार राज्यात सध्याच्या घडीला निवडणूक झाली तर कोणाला किती जागा मिळतील? कोणाला किती टक्के मते मिळतील, याबाबतचा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.

या सर्व्हेनुसार, महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळू शकतात. तर महायुती 120 ते 130 जागा मिळतील, असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी पाहिली असता महायुतीला 42 टक्के मते मिळू शकतात तर महाविकास आघाडीला 44 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 43.71 टक्के मते घेतली होती, तर महायुतीला 43.55 टक्के मते मिळवण्यात यश आले होते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांमध्ये देखील महाविकास आघाडीला यश मिळेल, असाच सर्व्हेचा अंदाज आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला 150 ते 160 जागा मिळाल्यास महाराष्ट्रात त्यांची सत्ता येऊ शकते.

याशिवाय या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केवळ 3.1 टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे सध्या तरी महायुती बॅकफुटवर दिसत असल्याचे इंडिया टुडे-सी व्होटर्सचा 'मुड ऑफ नेशन' सर्व्हे समोर आले आहे. या निवडणुकीतही महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली आहे.

लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा महाविकास आघाडीला फायदा झाला होता. त्यामुळे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. त्यासोबतच मराठा आरक्षणाचा मुद्दाही महाराष्ट्रात चांगलाच तापला आहे. त्याचा फटका कोणाला बसणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

विधानसभा निवडणूक राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढणार आहे. त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यांनतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, शेतकरी नेते राजू शेट्टी, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील आणि प्रहारचे बच्चू कडू यांसारख्या नेत्यांमध्ये तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरु आहे. त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास अनेक मतदारसंघांमध्ये 3 ते 4 उमेदवार उभे राहू शकतात, याचा फटका कोणाला बसणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT