Bachchu Kadu Sarkarnama
विशेष

Bachchu Kadu : मंत्रि‍पदासाठी 'वेटिंग'वर असलेल्या बच्चू कडूंचा अखेर 'एकला चलो रे नारा'! पण कुठपर्यंत एकटे चालणार?

Sunil Balasaheb Dhumal

Bachchu Kadu News : महाविकास आघाडी सरकारकमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंडात साथ दिली. त्यानंतर महायुती सरकारमध्ये पुन्हा मंत्रिपद मिळण्याची त्यांना आशा होती.

मात्र, अजित पवार गटाला 'मानाचे पान' देत बच्चू कडूंप्रमाणे अनेकांचे गुडघ्याचे बाशिंग गळून पडले. एकीकडे मंत्रिपदाची आशा नसल्याचं सांगत कडूंनी सरकारला वेळोवेळी 'चिमटे' घेण्याचं त्यासोबत 'आसूड' ओढण्याचं काम केलं आहे.

आता विधानसभा निवडणुकीत वेगळी 'चूल' मांडणार असल्याचे स्पष्ट करून कडूंनी माण-खटावमधून 'प्रहार'चा पहिला उमेदवारही जाहीर करून टाकला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत सतत भूमिका बदलणारे कडू विधानसभा निवडणुकीला खरेच एकटे चालणार का? अशी शंकाही राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानतंर बच्चू कडूंनी वारंवार महायुतीसोबत असल्याचे स्पष्ट केले. महायुतीत त्यांना मंत्रिपद मिळाले नसले तरी त्यांना 'दिव्यांग कल्याण विभागा'चे अध्यक्षपद देऊन मंत्रि‍पदाचा दर्जा दिला आहे. असे असले तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंनी आक्रमक भूमिका घेणे सुरू ठेवले.

लोकसभेत भाजपच्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना कडूंनी तीव्र विरोध केला. त्यांच्याविरोधात आपला उमेदवार देऊन महायुतीला '440 चा झटका' दिला. त्यानंतर मात्र विधान परिषद निवडणुकीत कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बाजूने मतदान केले. आता त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी थेट पहिला उमेदवार जाहीर केल्याने राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील छोटे घटक पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बच्चू कडू हे कायम आपला 'प्रहार जनशक्ती पक्ष' हा सर्व सामान्य जनतेचा, शेतकरी वर्गाचा व सर्व दिव्यांगाचा असल्याचे सांगतात. मात्र, शिवसेना फुटीत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना साथ दिल्यानं त्यांना अनेकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आता या निवडणुकीत एकटे लढून ते त्यांच्यावरील 'गद्दारी'चा शिक्का पुसण्याच्या विचारात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच त्यांनी आता विधानसभा निवडणुकीत राज्यातील 15 जागांवर लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

आमच्यासोबत युती करण्यास अनेकजण इच्छुक आहेत. पण, आमची रणनीती ठरलेली आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नसली तरी सामान्य जनतासोबत असल्याचा दावा कडूंनी केला आहे. सरकारने सामान्य जनतेला फसवलं आहे.

निवडणुका आल्या की शेतकऱ्यांचे प्रश्नांवर चर्चा होते. त्यावर मात्र कधीच तोडगा काढला जात नाही. त्यामुळे सामान्य लोकांचे प्रश्न 'प्रहार जनशक्ती पक्ष' सोडवू शकतो, असे बच्चू कडूंनी माण-खटावमध्ये सांगितले.

मात्र, विधानसभा निवडणुकीत अडीच तीन महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे सध्या बच्चू कडूंनी स्वबळाचे पहिले पाऊल टाकले, असले तरी ते कुठपर्यंत एकटे चालणार, याची चर्चा सुरू झालेली आहे. या काळात कडू आपल्या भूमिकेवर ठाम राहतात, की ते महायुती किंवा महाविकास आघाडीच्या कळपात शिरणार, याकडेही लक्ष आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT