Manoj Jarange Patil-Prakash Shendge-ChhaganBhujbal  Sarkarnama
विशेष

Chhagan Bhujbal : भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलणे, ही तर जरांगेंची इच्छापूर्ती; ओबीसी नेत्यांचा हल्लाबोल

Prakash Shendge's attack on Government : राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसींना सर्वाधिक संधी दिल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण, ओबीसींच्या प्रश्नावर हे सर्व मंत्री असले तरी सगळा गाव आहे मामांचा. पण, कामाचा एकतरी असला पाहिजे ना?

Vijaykumar Dudhale

Mumbai, 16 December : छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात राहून ओबीसींचा लढा एकहाती लढला, हे राज्यातील सर्व ओबीसी समाजाने पाहिले आहे. भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ओबीसींना मोठा धक्का बसला आहे. कदाचित महायुती सरकारने मनोज जरांगे पाटील यांची इच्छापूर्ती तर केली नाही ना? अशी भावना ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आहे, अशा शब्दांत ओबीसी बहुजन आघाडीचे नेते तथा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्याच्या निर्णयावर हल्लाबोल केला.

महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना स्थान देण्यात आले नाही. त्यावरून ओबीसी समाजातून तीव्र नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच मुद्यावरून प्रकाश शेंडगे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.

मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर पहिला आघात भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींवर झाला आहे. ओबीसींसाठी (OBC) मंत्रिमंडळात आता कोण लढणार आहे, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. सरकारने अजूनही विचार करावा. ओबीसींच्या या लढवय्या नेत्याने शरद पवार आणि अजित पवार यांना अनेक वर्षे साथ दिलेली आहे. अशावेळी मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर ठेवणे, हे ओबीसींच्या कोणत्याही कार्यकर्त्याना न पटणारा निर्णय आहे. आम्ही सर्व ओबीसी नेते आता भुजबळांना भेटणार असून त्यानंतर पुढची भूमिका आम्ही ठरवू, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

प्रकाश शेंडगे म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाला छगन भुजबळांनी कुठेही विरोधाची भूमिका घेतलेली नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देण्याबाबत आमचा कुठेही विरोध नाही. हीच भूमिका भुजबळांनी घेतलेली आहे. उलट येवल्यात येऊन मनोज जरांगे यांनी बारा तास ठिय्या देऊन भुजबळांना पाडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, पण राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जागा भुजबळ यांनी टिकवून ठेवली.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतील प्रमुख नेते आहेत, असं असताना नेमकं काय घडलं की भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवावं लागलं. यावर ओबीसी समाज म्हणून आम्ही भूमिका घेऊ. पण , आमचं म्हणणं आहे की, अजूनही त्यांनी भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यावं. राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्रिपद द्यायचं आहे, असा शब्द अजितदादांनी दिला, तर ओबीसी समाजात या सरकारविषयी किंवा राष्ट्रवादीबाबत सकारात्मक भावना तयार होऊ शकेल, असा दावाही शेंडगे यांनी केला.

राज्याच्या मंत्रिमंडळात मराठा समाजाचे १६, तर ओबीसींचे १७ मंत्री आहेत. मग, भुजबळांचा अट्टहास का. या प्रश्नावर शेंडगे म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसींना सर्वाधिक संधी दिल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण, ओबीसींच्या प्रश्नावर हे सर्व मंत्री असले तरी सगळा गाव आहे मामांचा. पण, कामाचा एकतरी असला पाहिजे ना? प्रसंगी सरकारच्या विरोधात जाऊन भूमिका मांडली पाहिजे ना? कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही, अशी भूमिका भुजबळांनी मांडली होती, तशी भूमिका आता मंत्रिमंडळात कोण मांडणार आहे. हा आमच्यापुढचा प्रश्न आहे, अशी खंतही प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT