Chandrakant Patil Visit Ambadas Danve Office Sarkarnama
विशेष

VIDEO Chandrakantdada On Anil Parab : चंद्रकांतदादांनी परबांचे पेढे ॲडव्हान्समध्ये वाटले; मुंबई पदवीधरमध्ये भाजपने पराभव मान्य केला का?

Vijaykumar Dudhale

Mumbai, 27 June : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात आलेले संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘मी अनिल परब यांच्यासाठी ॲडव्हान्समध्ये पेढे वाटतोय’ असे विधान केले. त्यांच्या विधानामुळे मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपने निकालाआधीच पराभव मान्य केला आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) आजपासून (ता. 27 जून) मुंबईत सुरू झाले आहे. हे अधिवेशन सुरळीतपणे चालावे, यासाठी संसदीय कार्यमंत्री या नात्याने भाजचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अगोदर हजर हेाते.

चंद्रकांतदादांच्या पुढे पेढ्याचा बॉक्स धरत अंबादास दानवे यांनी ‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 31 जागा निवडून आल्यामुळे आम्ही पेढे वाटत आहोत’, असा राजकीय चिमटा काढला. त्यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी हे एक मजेशीर विधान केले आहे आणि त्याचीच चर्चा आता होताना दिसत आहे.

अनिल परब यांच्यासाठी मी ॲडव्हान्समध्ये पेढे वाटतोय’ असे विधान चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. अनिल परब यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवली असून बुधवारी (ता. २६ जून) मतदान झाले आहे. येत्या एक जुलै रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे, त्याआधीच चंद्रकांतदादांच्या विधानाने राजकीय निरीक्षकही बुचकळ्यात पडले आहेत.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून किरण शेलार यांनी निवडणूक लढवली आहे. त्याचा निकाल येत्या 1 जुलै रोजी लागणार आहे, त्या अगोदरच चंद्रकांत पाटील यांनी हे विधान करून भाजपचा पराभव मान्य केला आहे की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.

दानवे यांच्या भेटीसाठी आलेल्या चंद्रकांतदादांनी अनिल परब यांना पाहताच अनिल परब एवढे निवांत कसे, असा प्रश्न विचारला. त्यावर ‘आज काही नाही, कार्यक्रम नाही, निवांत आहे’ असे उत्तर अनिल परब यांनी दिले. याचवेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना बसा, गप्पा मारायला असेही म्हटले. मात्र, अधिवेशनाची घाई असे सांगून चंद्रकांत पाटील निघून गेले. मात्र, त्यांनी केलेल्या विधानाने एकच खळबळ माजवली आहे.

चंद्रकांत पाटील यांचा उद्वव ठाकरेंसोबतचा संवाद अवघ्या काही मिनिटांचा असला तरी तो अनेक राजकीय समीकरणाला जन्म घालणारा ठरेल, याची चर्चा आता होताना दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT