Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
विशेष

विधानसभेत थोडंचं सांगितलंय, अजून खूप बाकी आहे; वेळ आणली तर...: एकनाथ शिंदेंचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : गेल्या काही वर्षांत ज्या काही गोष्ट आणि जो काही अनुभव मला आला. तो अनुभव तानाजी सावंतांना तर माझ्या अगोदरच आला होता. गेल्या दोन-अडीच वर्षांत मला जो काही अनुभव आला, त्याची चर्चा मी जाहीरपणे करू शकत नाही. विधानसभेतील भाषणात मी थोडंचं सांगितलंय. अजून खूप बाकी आहे. वेळ आली आणि वेळ आणली तर नक्कीच त्याचा उहापोह करेन, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी नाव न घेता शिवसेना नेत्यांना दिला. (Chief Minister Eknath Shinde's implicit warning to Shiv Sena leaders)

आषाढी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपुरात आले होते. महापूजेनंतर टाकळी या ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा झाला. त्यात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले की, माझ्यावर अनेक संकटं आली, प्रत्येक वेळी आनंद दिघे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते. पदासाठी आम्ही बंड केलेले नाही. आम्ही एका वैचारिक भूमिकेतून उचलेले हे पाऊल आहे. आम्ही हे पाऊल का उचलले, याची समिक्षा करण्याऐवजी आमच्यावर कडवट शब्दांत टीका करण्यात आली. पण, मी कधीही कुणावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. मी काम जास्त करतो आणि कमी बोलतो. मला मिळालेल्या संधीचे सोने राज्यातील जनतेसाठी करायचे आहे.

ज्या आमदारांनी माझ्यावर विश्वास टाकला, त्या आमदारांवर मी आच येऊ देणार नाही. त्यांचं कुठंही नुकसान होऊ देणार नाही. त्यांचं नुकसान होईल, असं वाटेल तेव्हा त्याची जबाबदारी मी स्वतः घेईन. वेळप्रसंगी टोकचं पाऊल उचलेल. पण, पन्नास आमदारांना तोशिस पडू देणार नाही. या ५० आमदारांपैकी एकानेही आपण कुठे चालेलो आहोत, काय करत आहोत, असं विचारलं नाही. मिळेल त्या गाडीतून सूरतकडे रवाना झाले, असेही एकनाथ शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले.

ज्यांच्यापासून मला धोका होता, तो आता टळला आहे.

पंढरपुरात रस्त्याच्या दुतर्फा स्वागतासाठी उभा राहिलेल्या लोकांचे गाडीच्या बाहेर येऊन अभिवादन स्वीकारले, तेव्हा पोलिस म्हणाले की तुम्हाला गाडीच्या बाहेर येता येणार नाही. मी पोलिसांनी सांगितले की, ज्यांच्यापासून मला धोका होता, तो आता टळला आहे. आता यांच्यापासून मला कसलाही धोका नाही. ही जनता म्हणजे माझे कवचकुंडले आहेत. वारकरी हा अन्यायाविरोधात वार करतो, पण आपल्या माणसांवर कधीही वार करत नाही. पण, आपल्याच माणसांनी आमच्यावर अनेक वार केले. ते आम्ही झेलेले आहेत, अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, अशी राज्यातील जनतेची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने काय झालं ते आपल्याला माहिती आहे. पण, जनतेने दाखवलेला विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाहीही एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT