DSP Manoj Patil
DSP Manoj Patil Sarkarnama
विशेष

नगरचे SP मनोज पाटील म्हणतात, ``टपरीवरच्या चहाचा आस्वाद घेणंही आवडतं``

प्रकाश पाटील

अहमदनगर - अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची कौटुंबिक पार्श्वभूमी ते प्रशासकीय सेवेबाबत त्यांनी ‘सकाळ’चे अहमदनगर आवृत्ती प्रमुख प्रकाश पाटील यांना दिलेल्या दिलखुलास मुलाखतीत अनेक आठवणींना उजाळा दिला. पुस्तक आणि मित्र हे माझे विकपॉईंट आहेत, हेही सांगण्यास ते विसरले नाहीत. Conflict is the key to success

मनोज पाटील यांनी सांगितले की, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत टिकून राहण्यासाठी आत्मविश्र्वास ढळू देऊ नका. सततचा संघर्ष यशाकडे घेऊन जातो. कोणत्याही परीक्षेला गुरूकिल्ली वगैरे काही नसतं. प्रामाणिकपणा, कष्ट आणि सातत्य ठेवल्यास यशाचं शिखर गाठता येतं, असं मत मनोज पाटील यांनी व्यक्त केलं.

मनोज पाटील पुढे म्हणाले की, तसं माझं मूळ गाव तासगाव (जि.सांगली) तालुक्यातील कौलगे. वडील गोविंद पाटील हे शेतकी खात्यात होते. त्यांच्या नोकरीमुळे माझे शिक्षण गावाऐवजी साताऱ्यात झालं. आपण पदवीधर नाही याची खंत वडिलांना होती. मुलांना उत्तम शिक्षण द्यायचं, असं त्यांना वाटत असे.

आम्हा भावंडांकडे वडील आणि आई मंदाकिनी पाटील यांनी विशेष लक्ष दिले. साताऱ्याच्या भोसले मिलिटरी स्कूलमध्येही होतो. पुढे एमपीएससीची परीक्षा दिली. पोलिस उपअधीक्षक (१९९८) म्हणून निवड झाली. जळगाव, कोल्हापूर, सातारा, कऱ्हाड, भिवंडी, पुणे, सोलापूर येथेही होतो. आता नगरमध्ये पोलिस अधीक्षक आहे. वडील शिस्तीचे भोक्ते होते. तसेच मनाने कणखर होते. आईने शिक्षणाचं महत्त्व नेहमीच पटवून दिलं. बुद्धीने सरस असाल, तरच लोक तुमचा आदर करतील ही आईची शिकवण. तिच्या या शिदोरीवरच माझी वाटचाल सुरू आहे.

‘मृत्यूंजय’प्रथम वाचली

पहिलं वाचलेलं पुस्तक कोणतं? वाचनाने काय दिलं? असे विचारता पाटील म्हणाले, ‘‘ मी आयुष्यात प्रथम शिवाजी सावंत यांची ‘मृत्यूंजय’ वाचली. ती मनाला इतकी भावली की काही विचारू नका. या पुस्तकानं मला वाचनाचं वेड लावलं. प्रत्येकानं नेहमीच शिकत राहिलं पाहिजे. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे तरूणाईने वाचलंच पाहिजे. वेळ मिळेल तसं वाचत असतो. तसेच व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेटही खेळायला आवडतं.

नवं शिकण्याची तयारी!

खरंतर मी पुण्यात येण्याअगोदर वाहतूक शाखेत कधीच काम केलं नव्हतं. पण, तेथे गेल्यानंतर सहकाऱ्यांकडून माहिती घेऊन अभ्यास केला आणि वाहतुकीला शिस्त लावली. मी स्वत: चौकातील सिग्नलवर थांबून वाहतूूक अनुभवली. नागरिकांना विश्र्वासात घेतले. कोणत्याही चांगल्या कामाला नागरिकांचा पाठिंबा असतो, असं मला वाटतं.

तरूणांना संदेश !

शहर असो की ग्रामीण. तरूणांनी स्वत:च्या आवडीनुसार क्षेत्र निवडले पाहिजे. कोणतीही नोकरी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नोकरी करताना आपल्याला देशासाठी, लोकांसाठी काम करायचंय याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे.

टपरीवरचा चहा आयुष्यात कोणती गोष्ट करायची राहून गेली याकडे लक्ष वेधले असता तेे म्हणाले, पोलिस अधिकारी आहे. वेळेचे नियोजन करतो. मला गाडी चालवायला आवडते. स्वत:ची गाडी असतेे तेव्हा ९९ टक्के मीच ड्राईव्ह करतो. तसेच फिरायला जाणं. मित्रांबरोबर गप्पा मारणं, कधीतरी जुन्या मित्रांबरोबर टपरीवरच्या चहाचा आस्वादही घेत असतो. खरं सांगू का मित्रांचा सहवास खूप भावतो.

घरी पै-पाहुण्यांचा राबता!

प्रशासकीय सेवेत आल्यानंतर स्वत:त बदल करावा लागतो. आपण लोकसेवक असतो हे विसरून चालत नाही. कुटुंबाला खूप वेळ देेता येत नाही. पत्नी मीनल हिचं कौतुक करावसं वाटतं. कारण ती समजून घेते. घरी पै-पाहुण्यांचा राबता असतो. काय हवं, काय नको हे तीच पाहते. प्रत्येकाच्या सुखा-दु:खात सहभागी होऊन मदत कशी करता येईल. आधार कसा देता येईल! हे आम्ही पाहतो. एकत्रित कुटुंब पद्धती अधिक भावते. घर पाहुण्यांनी, मित्रांनी भरलेलं असावं असं नेहमीच वाटतं हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

पुस्तक लिहायचंय!

कौटुंबिक परिस्थिती तशी बेताचीच होती. तरीही आई-वडिलांनी जे संस्कार केले. शिकवलं. मोठ केलं. प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यानंतर आजपर्यंतच्या अनेक आठवणी मनात घर करून राहिल्या आहेत. जग जसं अनुभवलं तसं लिहायचंय. पुस्तकरूपाने मला ते मांडायचंय, असेही मनोज पाटील यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT