Mumbai News : राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात महायुतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी महायुतीमधील घटक पक्ष जोरदार तयारी करीत आहेत. मंत्रिमंडळातील खातेवाटपावरून चुरस पहावयास मिळत असतानाच दुसरीकडे 1995 नंतर आतापर्यंत बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंना भाजपकडून वाटाघाटीत कधीच गृह खातं मिळवता आले नाही. मुख्यमंत्री पद मिळत नसेल तर गृह विभाग मिळवून वर्चस्व राखण्याचा एकनाथ शिंदेंचा प्रयत्न यशस्वी होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde news)
मतमोजणी होऊन आठ दिवस झाले आहेत. त्यानंतरही सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुरुवारी दिल्लीला गेले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. त्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडलेला असला तरी मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदे यांना राज्यातील गृहमंत्री पदासह अनेक महत्त्वाची खाती हवी असल्याचे समजते.
राज्य सरकारमध्ये 12 मंत्रीपदे व विधान परिषदेचे सभापतीपद त्यांना हवे आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाही शिंदेंकडे नगरविकास विभागाचा कारभार होता. याच खात्याच्या माध्यमातून त्यांनी शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांना मोठ्या प्रमाणात निधी दिला. त्यासाठी त्यांना काहीवेळा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी संघर्ष करावा लागला. आताही शिंदेंना नगरविकास खाते हवे आहे. शिंदे यांनी जरी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला असला तरी त्यांना गृह मंत्रालय हवे आहे, अशी स्पष्ट मागणी शिंदें यांनी केली आहे. त्याबद्दल शिंदेंना कोणताही शब्द देण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वोच्च पद मिळत नसेल तर गृह विभाग मिळवून वर्चस्व राखण्याचा शिंदेंचा प्रयत्न आहे.
राज्यात 1995 साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले. त्यावेळेसपासून भाजपने उपमुख्यमंत्री पद व गृह खातं आपल्याकडे ठेवले आहे. 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे हृयात होते. तेव्हा शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गृह खातं भाजपकडे होतं. उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होती. त्यानंतर राज्यात 1999 साली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. त्यावेळी हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता. त्यामुळे 1999 ते 2014 पर्यंत गृह खात्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती.
2014 मध्ये पुन्हा भाजप, सेनेचं सरकार आले. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदचं नव्हतं. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं आपल्याकडे ठेवले. पूर्ण 5 वर्षे त्यांनी हे खातं कोणालाही दिलं नाही. या कालावधीत सेनेला दुय्यम दर्जाची खाती दिली गेली होती. त्यानंतर 2019 साली पहिल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी करत सत्ता आणली. ते मुख्यमंत्री झाले. पण तेव्हाही त्यांना गृह मंत्रालय मिळवता आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख यांच्याकडे हे पद होते. त्यांच्यावर अनेक आरोप झाले त्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर 2022 मध्ये शिंदेंनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली. ते मुख्यमंत्री झाले. फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पद होते
1995 पासून आजपर्यंतचा इतिहास पहिला तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना भाजपकडून वाटाघाटीत कधीच गृह खाते मिळवता आले नाही. त्यामुळे हे पद भाजपकडून सोडवून घेण्यात शिंदेंना यश येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच आता शिंदेंना उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपद हवे असल्याचे समजते. मुख्यमंत्रिपद सोडले असल्याने शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपकडे त्यांनी गृह मंत्रालयाची मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजपकडून त्यांची मागणी पूर्ण केली जाऊ शकते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.