Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
विशेष

Ajit Pawar Interview : ‘शिंदेंच्या गाड्या थेट मातोश्रीवर आणा’; पण अधिकारी ‘लॉयल’ राहिला अन्‌ सत्ता परिवर्तन झाले! : अजितदादांनी उलगडला सूरतचा रस्ता

Vijaykumar Dudhale

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे २० जून रोजी बाहेर पडले. त्यावेळी त्यांनीच ठाण्यात आणून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूरतचा रस्ता सुरक्षितपणे प्रशस्त करून देण्याचे काम केले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) त्या अधिकाऱ्याला आदेश दिला होता की, शिंदेंच्या गाड्या जिथं असतील, तेथून वळवा आणि मातोश्रीवर आणा. पण, तो अधिकारी एकनाथ शिंदेंशी ‘लॉयल’ राहिला आणि गाड्या राज्याबाहेबर पडल्यावर गाड्या अजून कुठे दिसत नाहीत, असा निरोप मुख्यमंत्री ठाकरेंना त्यावेळी दिला, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ‘सकाळ’ने घेतलेल्या मुलाखतीमधून उलगडून सांगितली. (Eknath Shinde's road to Surat was cleared by an officer : Ajit Pawar)

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी विविध विषयावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीत काय घडलं तर आमचे पक्षश्रेष्ठी आणि आम्ही पाहत होते. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे पाहत होते. शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे पाहत होते. आम्ही वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि पवारसाहेबांना एकनाथ शिंदेबाबत सांगत होतो. पण, आमच्या हातात राज्य असतानाही काही गोष्ट व्यवस्थितपणे झाल्या.

उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावा, हे ठरविण्याचा अधिकार मोठ्या विश्वासाने एकनाथ शिंदे यांना दिला होता. पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त, पोलिस अधीक्षकही ते ठरवत होते. एकनाथ शिंदे हे २० जून रोजी बाहेर पडले. त्यावेळी त्यांनीच आणून ठेवलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सूरतचा रस्ता सुरक्षितपणे दाखविण्याचे काम केले.

त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्या अधिकाऱ्याला सांगितलं हेातं की जिथं गाड्या असतील, तेथून त्या गाड्या वळवा आणि मातोश्रीवर आणा. मात्र, त्या अधिकाऱ्याला त्या पदावर बसविण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले हेाते. त्यामुळे ते सर्व अधिकारी एकनाथ शिंदेंशी लॉयल राहिले आणि गाड्या राज्याबाहेर पडल्यावर त्यांनी गाड्या अजून कुठे दिसत नाहीत, असा निरोप दिला, असे पवार यांनी नमूद केले.

अजितदादा म्हणाले की, राजकीय घडामोडी अचानक घडलेल्या नव्हत्या. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. आम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालत होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतही होते. मात्र शिंदे यांनी शेवटपर्यंत ताकास तूर लागू दिला नाही. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून भाजप हे सरकार घालविण्यासाठी पहिल्या दिवसांपासून प्रयत्न करत होते. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीच सांगितले आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या काही शेकड्यांमध्ये बैठका झाल्या आहेत, हे एका मंत्र्यानेच परवा सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT