Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari Sarkarnama
विशेष

एकनाथ शिंदेंच्या बंडात राज्यपालांची एन्ट्री; ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल?

तात्या लांडगे

सोलापूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यात सध्या मोठा कायदेशीर पेचप्रसंग उभा राहिला आहे. शिंदे यांनी आपल्यासोबत नऊ मंत्र्यांसह तब्बल ४० पेक्षा आमदार असल्याचा दावा केल्याने महाविकास आघाडी सरकार सध्या तांत्रिकदृष्ट्या अल्पमतात आले आहे. मात्र, हे सर्व विधानसभेत सिद्ध करावे लागणार आहे, त्यामुळे कोरोनातून बरे होऊन राजभवनात दाखल झालेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देऊ शकतात, असा सूर कायदेतज्ज्ञांमधून उमटत आहे. (Gvernor can order to Thackeray government majority in the assembly)

महाविकास आघाडीतील शिवसेनेकडे ५५, काँग्रेसचे ४४ आणि राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. याशिवाय काही अपक्ष आणि छोट्या पक्षांनी महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर पाठिंबा दिला होता. त्यापैकी आता किती त्यांच्यासोबत राहतात, हे विधानसभेत बहुमत चाचणीच्या वेळीच स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे, भाजपकडे १०६ आमदार असून काही अपक्षांचा त्यांनाही पाठिंबा आहे. महाविकास आघाडीकडे सध्या कागदावर तरी बहुमत आहे. पण, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत त्यांच्यासोबत जवळपास ४२ आमदार नेल्याने सरकार अल्पमतात आल्याचे मानून राज्यपाल राज्य सरकारला पुन्हा एकदा बहुमत सिध्द करायला लावू शकतात, अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर उद्धव ठाकरे हे स्वत:हून मुख्यमंत्रिपद सोडतील आणि त्याठिकाणी सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या नेतृत्वाखाली संधी देतील, असा विश्वास काहींना विशेषतः एकनाथ शिंदे यांनाच होता. पण, तसे काही घडले नाही. शिवसेना आमदारांची ही खदखद ओळखून विरोधी पक्षाकडून त्याला खतपाणी घालण्यात आले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना स्वकीयांच्या बंडखोरीला सामोरे जावे लागले. बंडखोर आमदार हे २० जूनपासून राज्याबाहेर आहेत. यात काही मंत्रीही आहेत. त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील जनतेची कामे रखडली आहेत. बंडखोर आमदारांविरोधात व त्यांच्या समर्थनार्थ अनेकजण रस्त्यावर उतरत आहेत. काही आमदारांची कार्यालये फोडली जात आहेत. राज्यातील ही परिस्थिती पाहून राज्यपाल सरकारला बहुमत सिध्द करण्याचे आदेश देऊन हा राजकीय संषर्घ संपुष्टात आणू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मुख्यमंत्रिपदाचा पेच पुन्हा निर्माण होऊ शकतो

राज्यातील सत्ता नाट्य संपविण्यासाठी भाजप-शिवसेना युती झाल्यास आताचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच कायम राहणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांना घेऊन भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन झाल्यास शिवसेनेचा नेता मुख्यमंत्री होईल का, असाही प्रश्न शिवसैनिकांच्या मनात आहे. आगामी काही दिवसांत ते चित्र स्पष्ट होईल. तत्पूर्वी, केंद्रीय स्तरावरून किंवा राज्यपालांच्या माध्यमातून हा पेच सुटू शकतो, असे बोलले जात आहे.

राजभवन पुन्हा केंद्रस्थानी

शिवसेनेचे नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरूध्द बंड पुकारून ५५ पैकी ४० हून अधिक आमदार गुवाहाटीला नेले आहेत. त्यात नऊ मंत्र्यांचाही समावेश आहे. राज्याचा कारभार सांभाळताना बंडखोरी करून मंत्री कारभार सोडून जाणे हे घटनात्मकदृष्ट्या बेकायदेशीर आहे. त्यावरही राज्यपाल काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष आता राजभवनाकडे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT