Manohar Joshi Sarkarnama
विशेष

Vidhansabha Election Flashback 1995 : महाराष्ट्रात प्रथमच काँग्रेसची हार; आलं युतीचं सरकार !

Sandeep Chavan

Maharashtra Political News : साखळी बॉम्बस्फोटानं हादरलेली मुंबई आणि किल्ल्लारी भूकंपानं भेदरलेला महाराष्ट्र या दोन्ही अवस्थेतून गेलेल्या महाराष्ट्रात 1995 ला विधानसभा निवडणूक लागली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच म्हणजे 35 वर्षांनी काँग्रेसचं सरकार जाऊन शिवसेना-भाजप युतीचं सरकार सत्तेत आलं. शिवसेनेचे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. नेमकं काय घडलं होतं या निवडणुकीत?

288 जागा, 36 पक्ष, 3196 अपक्ष!

1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस अशी मुख्य लढत पाहायला मिळाली. काँग्रेसनं 286 जागा लढवल्या तर शिवसेना-भाजप युतीनं अनुक्रमे 169 आणि 116 जागा लढवल्या. एकूण 36 पक्षांसह 3196 अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आणि सुरू झाला विधानसभा 1995 चा रणसंग्राम...

एक-दोन नव्हे, 45 अपक्ष बनले आमदार!

या निवडणुकीत काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर पिछेहाट झाली. 1990 च्या तुलनेत काँग्रेसच्या 61 जागा घटल्या. काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर विजय मिळवता आला. शिवसेना-भाजप युतीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. शिवसेनेनं 73 तर भाजपनं 65 जागा जिंकल्या.

1990 च्या तुलनेत शिवसेनेच्या 21 तर भाजपच्या 23 जागा वाढल्या. युतीनं एकूण 138 जागा जिंकल्या. भारिप आणि बसपनं अनुक्रमे 129 आणि 145 जागा लढवल्या पण दोन्ही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही.

या निवडणुकीत एकूण 36 पक्षांपैकी 09 पक्षांना जागा जिंकता आल्या तर 27 पक्षांच्या हाती भोपळा लागला. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 45 अपक्ष उमेदवार आमदार बनले. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं अपक्ष उमेदवार निवडून देणारी ही पहिलीच निवडणूक ठरली.

इतर काही पक्षांनी जिंकलेल्या, लढवलेल्या जागा

जनता दल - विजयी - 11 -लढवलेल्या जागा -182

शेकाप - विजयी - 06 - लढवलेल्या जागा - 42

माकप - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 18

सप - विजयी - विजयी - 03 - लढवलेल्या जागा - 22

नाग विदर्भ आंदोलन समिती - विजयी- 01 - लढवलेल्या जागा - 02

महाराष्ट्र विकास काँग्रेस - विजयी - 01 - लढवलेल्या जागा - 03

शिवसेनेचे मनोहर जोशी युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 35 वर्षांनी म्हणजे 1960 पासून 1995 नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावं लागलं आणि मंत्रालयावर भगवा फडकला. युतीचं सरकार सत्तेत आलं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी या युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले. मनोहर जोशींना मात्र त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ काही पूर्ण करता आला नाही. मनोहर जोशींनी दिलेल्या राजीनाम्यानंतर 1 फेब्रुवारी 1999 रोजी शिवसेनेचे नारायण राणे मुख्यमंत्री बनले.

पुढील भागात विधानसभा फ्लॅशबॅक : 1990

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT