MVA maha morcha
MVA maha morcha Sarkarnama
विशेष

आघाडीच्या महामोर्चासाठी तीन कोटींचा खर्च? ठाकरेंचा पुढाकार, राष्ट्रवादीची साथ अन् काँग्रेसचा हात

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

MVA maha morcha : शिंदे-फडणवीसांच्या सरकारला रस्त्यावरची ताकद दाखवून लोकांच्या गर्दीची बेरीज केलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या तिजोरितूनः मात्र तब्बल तीन कोटी रुपयांची वजाबाकी झाल्याचा प्राथमिक 'हिशेब' आहे. मोर्चा मुंबईत असल्याने एकूण खर्चापैकी बहुतांशी रक्कम शिवसेनेच्या नेतृत्वाने मोजल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यापाठोपाठ ठाकरे सरकारमध्ये 'अर्थ' खाते सांभाळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) कोटी रुपयांच्या खर्चाचा भार उचलल्याचे आकडे पुढे येत आहेत; तर काँग्रेसनेही (Congress) आपल्या राजकीय 'वजन' सारखेच जमेल तसा हातभार लावला. मोर्चा संपताच काही तासांतच तिन्ही पक्षांकडून खर्चाचा तपशिल जुळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. याबाबतचे आकडे पुढच्या दोन दिवसांत नेतृत्वापुढे मांडले जाणार आहेत. परिणामी, पैसा गेल्याचे दुःख नाही पण लोक जमल्याचा आनंद आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर लपून राहिला नाही.

सत्तेतून बाहेर काढलेल्या आणि त्यानंतर निरनिराळ्या मुद्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारसोबत दोन हात करणारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेससह अन्या विरोधक शनिवारी रस्त्यावर उतरले. सत्ता गेली, मंत्री, आमदार, खासदार फुटले, पक्ष: संघटना खिळखिळी झाली तरीही मुंबईत आणि महाराष्ट्रात राजकीय ताकद टिकून असल्याचे दंड थोपटून सांगणाऱ्या शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अर्थात, या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोर्चाच्यासाठी प्रतिष्ठापणाला लावली होती.

आपल्या राजकीय शत्रूंना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान देण्याच्या इराद्याने ठाकरे हे मोर्चाच्यासाठी वाटेल तशी किमत मोजायला तयार होते. म्हणजे, केवळ पैसाच नव्हे तर कार्यकत्यांची फौज उतरविण्याची त्यांची तयारी होती. सत्ता गेल्याने हवालदिल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला भक्कम साथ दिली. राज्यभरातील कार्यकर्त्यांना बोलावून शक्तीप्रदर्शनाची संधी साधली. राजकीयदृष्टया अडगळी सापडलेली कॉंग्रेसही मागे राहायचे नाही, या बेतानेच मैदान उतरली होती.

या मोर्चाकडे राज्याचे लक्ष लागून असतानाच त्याच्या परवानगी आणि गर्दीवरून सत्ताधारी विरोधकांत वाद पेटला होता. या वादातील दावे-प्रतिदाव्यांवरून राजकारण तापले होते. परंतु, गर्दीचा मुद्दा महत्त्वाचा झाल्याने ठाकरेंसह दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी साम, दाम आणि दंड वापरण्याची तयारी ठेवून मोर्चा काढला. मोर्चातून वातावरण तयार होऊन सरकारविरोधी लाट निर्माण करण्याकरिता शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या खिशाला तीन कोटी रुपये मोजावे लागल्याचे आकडेमोडीवरून सांगण्यात आले. याबाबतचा अधिकृत हिशेब पुढच्या दोन दिवसांत त्या-त्या पक्षांच्या कार्यालयांत उपलब्ध होऊ शकतो, असे एका नेत्याने सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT