Election Commission PC Sarkarnama
विशेष

Election Commission PC : सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत ठेवल्या? निवडणूक आयुक्तांचे सडेतोड उत्तर...

Vijaykumar Dudhale

New Delhi : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यात संपूर्ण देशात सात टप्प्यांत निवडणुका होतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले. मात्र, सत्ताधारी पक्षाच्या फायद्यासाठी सात टप्प्यांत निवडणुका घेण्यात येत आहेत, असा आरोप करण्यात आला. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यासंदर्भात ‘कोणाचा भ्रम असेल तर चुकीचा आहे,’ असे सडेतोड उत्तर दिले.

मुख्य निवडणूक आयुक्त (Election Commissioner) राजीव कुमार () यांनी आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयुक्त एस. एस. सिंह आणि ज्ञानेश कुमार यांच्या उपस्थितीत लोकसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात देशात 19 एप्रिल ते 1 जून अशा 7 टप्प्यांत मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मेपर्यंत पाच टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात 19 आणि 26 एप्रिल 7, 13 आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. देशातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे.

सात टप्प्यांत निवडणुका घेण्याचा सत्ताधारी पक्षाला फायदा होतो, असा आरोप होतो. मात्र, तुम्ही कधीतरी देशाची भौगोलिक परिस्थिती आणि इतिहास एकदा बघा. देशात नदी, नाले, डोंगर, बर्फ, जंगल आणि तापमान कसं असतं हे एकदा तुम्ही अनुभवा. सुरक्षा दलाची हालचाली कधी तुम्ही पाहिल्या आहेत काय? त्यांच्यावर असणारा तणाव (प्रेशर) तुम्ही कधी जाणून घेतली आहे का, असे सवाल राजीव कुमार यांनी उपस्थित केले.

राजीव कुमार म्हणाले, इलेक्शन मशीनची प्रक्रिया, तसेच या लोकसभा निवडणुकीच्या काळात वेगवेगळे सण, समारंभ आणि परीक्षाही आहेत. आम्ही जेव्हा कॅलेंडर घेऊन बसतो, तेव्हा एक तारीख निश्चित होते, त्यावेळी दुसरी तारीख निश्चित करताना त्यात काही तरी अडचणी निर्माण होतात.

आम्ही कुणाच्या फायद्यासाठी किंवा कुणाचे नुकसान करण्यासाठी कोणताही निर्णय घेत नाही. कोणाच्या मनात असा काही भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. आम्ही वास्तववादी बोलतो. प्रत्येक राज्य वेगवेगळे आहे. काही राज्यात एका टप्प्यात, तर काही राज्यात सात टप्प्यांत निवडणुका होत आहेत. ज्या राज्यात जास्त टप्पे आहेत, त्या राज्यात लोकसभेचे मतदारसंघ जादा आहेत, असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT