Manohar joshi Uddhav thackeray Balasaheb Thackeray Raj thackeray  Sarkarnama
विशेष

Manohar Joshi : राज अन् उद्धव ठाकरेंबाबत मनोहर जोशींची 'ती' इच्छा अधुरीच राहिली...

Akshay Sabale

27 नोव्हेंबर 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली होती. या घटनेला 19 वर्षे झाली आहे. गेल्या 19 वर्षांत बरंच काही घडलं आहे. शिवसेना पक्षही उद्धव ठाकरे यांच्या हातून एकनाथ शिंदे यांच्याकडे गेला आहे. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना नवीन नाव आणि चिन्ह दिलं आहे. राज ठाकरेंनी पक्ष सोडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. त्यासह सतत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी ( Manohar Joshi ) यांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, मनोहर जोशी यांची ती इच्छा अधुरीच राहिली आहे. ( Manohar Joshi Latest News )

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनोहर जोशी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचं भाषण यावर भाष्य केलं होतं. मनोहर जोशी म्हणाले, "माझे आडनाव जोशी आहे. पण, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का, हे सांगण्यासाठी मी ज्योतिषी नाही. त्यामुळे ते कधी एकत्र येतील, हे सांगता येणार नाही, पण त्यांनी एकत्र यावं, असं मला निश्चितपणे वाटतं."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"त्यांच्यातील भांडणे मिटली पाहिजेत, असं माझंही मत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील भांडण एवढं टोकाचं आहे की, त्यातून मार्ग काढण्याची आज तरी कोणाची इच्छा नाही. नव्वद टक्के भांडणे ही चर्चेतून सुटू शकतात, असा माझा अनुभव आहे," असं मनोहर जोशींनी म्हटलं होतं.

"आकाश आणि जमीनही कुठे तरी एकत्र येतात. त्यामुळे राज ठाकरे व उद्धव ठाकरे हेही एकत्र येऊ शकतील, असा मला विश्वास वाटतो. उद्धव ठाकरेंशी या विषयावर अनेकदा मी बोललो आहे. राज ठाकरेंनी शिवसेनेतील सर्व पदांचा राजीनामा दिला, तेव्हा मी व संजय राऊत यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्या संतप्त समर्थकांनी संजय राऊत यांची गाडी फोडली होती. आज जरी भावना तीव्र असल्या तरी कालांतराने त्यांची तीव्रता कमी होत जाईल. खरे म्हणजे यांच्यातील भांडणाचे कारण काय, हा प्रश्न मला भेडसावतोय. खरे कारण अजूनही कळलेले नाही. त्या दोघांशी माझे जवळचे संबंध आहेत. तेही मला जवळचे मानत असावेत. दोघेही माझ्यासमोर बसले तर त्यांच्यामधील वाद मिटविण्यासाठी मी चर्चा करायला केव्हाही तयार आहे. त्यांच्यातील भांडणे मिटलीच पाहिजे," असं मत मनोहर जोशींनी मांडलं होतं.

"उद्धव ठाकरे बाळासाहेबांसारखे भाषण करतात"

मनोहर जोशींनी सांगितलेलं, "बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेत अनेकजण पट्टीचे वक्ते होते. तेव्हाच्या भाषणांची मजा काही औरच होती. वक्त्यांची भाषेवर पकड होती. ती मजा आता दिसत नाही. त्यावेळी प्रमोद नवलकर, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी यांच्यासह अनेकजण सभा गाजवायचे. बाळासाहेबांच्या भाषणाचा बाजच वेगळा होता. थेट शिवसैनिक आणि श्रोत्यांशी संवाद साधण्याची बाळासाहेबांची शैली होती. वाचन आणि आकलन उत्तम असण्याबरोबर प्रतिभासंपन्न असल्यामुळे एक जबरदस्त पकड त्यांच्या वक्तृत्वात होती. उद्धव ठाकरेंच्या आताच्या भाषणातही बाळासाहेबांचा भास होतो."

"सुरुवातीचे आणि आताचे उद्धव ठाकरे या पुष्कळ फरक पडला आहे. 45 वर्षे बाळासाहेबांना मी ऐकत आलो आहे. त्यांचे काही गुण-दोष माझ्यातही आले आहेत. काहींकडे जन्मत:च प्रतिभेची देणगी असली तरी त्याच्या विकासासाठी वाचन आवश्यक आहे. उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या भाषणाचा वारसा आला आहे," असं मनोहर जोशींनी सांगितलं होतं.

"राज ठाकरेसुद्धा बाळासाहेबांसारखे बोलतात..."

"उत्तम भाषण करण्यासाठी वाचन करणे, फिरणे आणि अनुभवाची आवश्यकता असते. राज ठाकरे यांना स्वत:ची स्टाइल आहे आणि ती बाळासाहेबांसारखीच आहे. भाषण करताना बाळासाहेब मध्ये थांबत... तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेसुद्धा भाषण करताना एखादा मुद्दा सांगून पॉज घेतात," असं मनोहर जोशींनी म्हटलं होतं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT