MP Amol Kolhe
MP Amol Kolhe Sarkarnama
विशेष

मौनात गेलेले कोल्हे अवतरले अन्‌ भाजपवर हल्लाबोल करत म्हणाले ‘मी राष्ट्रवादीत...’

रवींद्र पाटे

नारायणगाव (जि. पुणे) : गेल्या काही दिवसांपासून राजकीय विजनवासात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) आज (ता. २० नोव्हेंबर) सोशल मीडियाच्या माध्यमातून अवतरले. त्यांनी भाजप आणि राज्यपालांवर प्रश्नांचा हल्लाबोल करत भाजप (BJP) प्रवेशाबाबत उठलेल्या वावड्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय ‘सरकारनामा’शी बोलताना त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज नसल्याचेही स्पष्ट केले. कोल्हे यांच्या या स्पष्टीकरणानंतर त्यांच्या पक्षांतराच्या बातम्यांना ब्रेक लागणार आहे. (MP Amol Kolhe said, I am not Upset in NCP)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला. यावेळी त्यांनी भाजपवर प्रश्नांचा भडीमार करत त्यांच्या पक्षांतरांच्या वावड्या थांबविण्याचा प्रयत्न केला.

खासदार डॉ. कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच कमळ हाती घेणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या निमित्ताने भेट घेतल्यानंतर त्यांच्याबाबतच्या चर्चेला वेग आला होता. या बाबत खासदार डॉ. कोल्हे यांनी कोणतीही प्रतिक्रिया जाहीर न केल्याने या चर्चेला बळ मिळत होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, असे खासदार डॉ. कोल्हे यांनी सुनावले. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चेला सध्या तरी पूर्ण विराम मिळाला असल्याचे मानले जात आहे. याशिवाय ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराज नसल्याचे त्यांनी ‘सरकारनामा’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. शिवाजी महाराज आमची अस्मिता आहेत. त्रिवेदी आपण आपले वक्तव्य मागे घ्या. भारतीय जनता पक्षाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे, हे महाराष्ट्रासमोर स्पष्ट करावे. महाराष्ट्राची अस्मिता दुखावल्याबद्दल संपूर्ण राज्याची माफी मागावी, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

नेमकं तुम्हाला खुपतंय काय?

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले विधान संतापजनक आहे. या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं तुम्हाला खुपतंय काय. महाराजांविषयी कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात. तर कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता व राजसत्ता दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचे काम करावे. हा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. हे तुम्हाला खुपतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही, तर धर्म हा माणसासाठी आहे. हे वास्तव आधोरेखित केले आहे, हे तुम्हाला खुपतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका उदात्त ध्येयासाठी कसे प्रेरित केले जाऊ शकते, हे उदाहरण घालून दिले. हे तुम्हाला खुपतंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचे राज्य, लोककल्याणकारी रयतेचे राज्य, आपले स्वराज्य कसे असावे, याचा आदर्श वस्तू पाठ घालून दिला, हे तुम्हाला खुपतंय. नक्की खूपतेय तरी काय तुम्हाला हाच मोठा प्रश्न पडतोय, अशा प्रश्नांचा भडिमार कोल्हे यांनी भाजपवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT