poonam mahajan | pankaja munde | pritam munde
poonam mahajan | pankaja munde | pritam munde sarkarnama
विशेष

Pankaja Munde News : मुंडे-महाजन ना विधानसभेत ना लोकसभेत

Sachin Waghmare

Lok Sabha Election 2024 Result : महाराष्ट्रातील भाजपच्या जडणघडणीत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या आघाडीच्या शिलेदारांचा मोठा वाटा होता. तब्बल ३० वर्षांपेक्षा अधिककाळ त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर अधिराज्य गाजवले.

मुंडे-महाजन या दोघांनी त्याकाळी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. पूर्वीचा जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली.

महाजन आणि मुंडे या दोघांचाही अकाली मृत्यू झाला. यानंतर दोघांचा राजकीय वारसा त्यांच्या मुलींनी पुढे नेला. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंडे आणि महाजन यांच्या मुली विधानसभा, लोकसभेपासून दूर राहिल्या आहेत. गेल्या ४५ वर्षाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदाच या दोन कुटूंबातील कोणीच सभागृहात नसणार आहे.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) या दोन नेत्यांचा महाराष्ट्रात भाजप स्थापन करण्यात मोठा वाटा आहे. एकेकाळी शून्यावर असलेल्या पक्षाचा विस्तार करण्यात मुंडे-महाजन जोडीने मोठे योगदान दिले.

मुंडे-महाजन जोडगोळीने भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या दोघांना बळ दिले. त्यामुळे राज्यात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम

उच्चवर्गीयांपुरत्या मर्यादित असलेल्या भाजपला तळागाळातील लोकांपर्यंत नेण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. भाजपला (BJP) मुंडे यांनी त्या प्रतिमेतून बाहेर काढून तळागाळापर्यंत पोहोचवतानाच आपल्याबरोबर विविध समाजघटकांतील नेत्यांची फळी उभी केली होती. गोपीनाथ मुंडे यांनी 1980 ते 2009 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

2009 ते 2014 पर्यंत लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते होते. त्यासोबतच 14 मार्च 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते.

त्याकाळी महाराष्ट्र राज्यातील भाजप आमदारांची मोठी फळी त्यांच्या सोबत होती. त्यामुळे राजकारणात मोठा दबदबा होता. गोपीनाथ मुंडे यांचे 3 जून 2014 रोजी दिल्लीत अपघाती निधन झाले.

प्रमोद महाजनांची राजकीय वाटचाल

भाजपमध्ये अटल बिहारी वाजपेयींनंतर कोण ? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे. त्यामुळे ते पंतप्रधान बनतील, अशी एक सर्वांची आशा होती. पण महाजन हे नेता होणे नियतीला मान्य नव्हते. तिने महाजनांना हिरावून नेले.

1996 ते 1998 ईशान्य मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 16 मे 1996 ते 1 जून 1996 काळात केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम केले. तर 13 ऑक्टोबर 1999 ते 29 जानेवारी 2003 मध्ये संसदीय कार्य मंत्री होते.

तर 2 सप्टेंबर 2001 ते 28 जानेवारी 2003 केंद्रीय दूरसंचार व सूचना मंत्री होते. तर काही काळ ते पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे राजकीय सल्लागार होते. प्रमोद महाजन यांचे निधन 3 मे 2006 रोजी निधन झाले.

बालपणीचे मित्र ते भाजपचा चेहरा अशी ओळख

प्रमोद महाजन (Pramod Mahajan) आणि मुंडे यांनी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला होता. स्‍वामी रामानंद तीर्थ कॉलेजमधून दोघांचे शिक्षण घेतले होते.

भाजपचे दिवंगत नेते वसंतराव भागवत यांच्या प्रेरणेतून महाजन आणि मुंडे राजकारणात आले होते. त्यानंतर दोन्ही महाराष्‍ट्रात भाजपचा चेहरा बनले. राज्यात सभेवेळी गर्दी खेचणारे नेते अशी ओळख होती. 1980 ते 2006 पर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी या दोघांवर होती.

प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे हे एकमेकांचे मित्र होते. त्याशिवाय प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा या गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे मित्र ते नातेवाईक असा प्रवास या दोघांचा राहिला.

पूनम महाजन यांना मिळाली संधी

प्रमोद महाजन यांची 2006 मध्ये हत्या झाली होती. यानंतर त्यांची मुलगी पूनम महाजन यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि मोदी लाटेत त्या विजयी झाल्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत सलग दोनदा निवडून आले.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईच्या जागेवरून त्यांची उमेदवारी शेवटच्या क्षणी कापण्यात आली. त्यामुळे त्यांना हॅट्रिक करता आली नाही. त्यांच्या जागी भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली मात्र ते पराभूत झाले. उमेदवारी न मिळाल्याने पूनम महाजन आता संसदीय राजकारणापासून दूर गेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांचे पुनर्वसन कसे केले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडेंना उमेदवारी

बीड लोकसभा मतदारसंघातून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे दुसऱ्यांदा विजयी झाले होते. त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर चार दिवसातच त्यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले.

त्याच दिवशी गावात सत्काराचा कार्यक्रम होता, त्याच दिवशी त्यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची दुसरी कन्या प्रीतम मुंडे यांना तिकीट देण्यात आले. त्या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.

पंकजा मुंडे यांनी जपला वारसा

गोपीनाथ मुंडे यांचा वारसा पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी समर्थपणे पेलला. 2014 साली निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांचा संघर्षाचा वारसा जपला. त्यांनी राज्यभरातून संघर्ष यात्रा काढत 2014 साली राज्यात भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. 2014 ते 2019 मध्ये त्या राज्याच्या ग्रामविकास मंत्री होत्या. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला होता.

प्रीतम मुंडे यांना दिली नाही उमेदवारी

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी राजकारणात प्रवेश केला. 2014 साली मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड मतदारसंघातून निवडणूक लढविताना सहा लाखांहून अधिक मते मिळवून विजयी झाल्या.

त्यानंतर 2019 प्रीतम मुंडे सलग दुसऱ्या वेळी विक्रमी मतांनी खासदार म्हणून निवडून आल्या. मात्र, 2024 मध्ये पंकजा मुंडे यांना उमेदवारी न देता त्यांच्या मोठ्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे आता प्रीतम मुंडेही बाहेर पडल्या आहेत.

पंकजा मुंडे यांचा पराभव

खासदार प्रीतम मुंडे यांची उमेदवारी कापून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणे भाजपच्या काहीसे अंगलट आले आहे. बीड लोकसभा मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा 6,585 मतांनी पराभव स्वीकारावा लागला.

मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रभाव या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जाणवला. त्याचा फटका पंकजा मुंडे याना बसला. या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवला.

दुसऱ्यांदा पराभव

बीड लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहीला आहे. या बालेकिल्ल्यात पंकजा मुंडेंना दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 2019 साली परळी विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता.

त्यानंतर आता लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला आहे. पंकजा मुंडे यांचा दुसऱ्यांदा पराभव झाला आहे. त्यामुळे साहजिकच त्या संसदीय राजकारणापासूनही दूर गेल्या आहेत.

SCROLL FOR NEXT