Shahaji Bapu Patil
Shahaji Bapu Patil  Sarkarnama
विशेष

शहाजीबापू पाटलांचा मोठा गौप्यस्फोट, ‘आम्ही एकनाथ शिंदेंनाही सोडणार होतो...’

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अजिबात शत्रू मानू नये. त्या माणसांनं उरावर धोंडा ठेवून हा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे कितीवेळा रडलं. सूरतमध्ये रडलं, गुवाहाटीमध्ये दोनदा रडलं. आमच्यासोबत असणाऱ्या एका आदिवासी आमदाराने सांगितलं की, एकनाथ शिंदे हे मुंबई सोडल्यापासून सूरतपर्यंत रडतच होते. काय बोलतं नव्हते. पण, ‘निर्णय घ्या नाही तर तुम्हालाही सोडून आम्ही निघाले,’ अशी हट्टाची भूमिका आम्ही घेतली होती. आम्ही शिंदेंनाही सोडलं असतं, पण आम्ही शिवसेनेत थांबत नव्हतो. शिवसेनेत आम्ही मरायला लागलो होतो. काय करता शिवसेनेत राहून, असा मोठा गौप्यस्फोट सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Patil) यांनी केला. (Shahjibapu Patil's big secret blast, 'We were going to release Eknath Shinde too; But...')

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार शहाजी पाटील यांनी हा दावा केला आहे. निर्णय घेण्यासाठी आम्ही ४० ते ४२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या मोठ दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी ही निर्णय घेतला, असे आमदार पाटील यांनी या वेळी नमूद केले. बहुधा हा निर्णय घेण्यासाठी त्यांचे मन तयार होत नव्हते, त्यामुळेच मुंबई ते सूरत या प्रवासादरम्यान कोणाशीही न बोलता सतत रडत होते, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असा माणदेशी भाषेतील माझा संवाद एवढा गाजेल असे मलाही वाटलं नव्हतं. खासदार संजय राऊत, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या संवादाबाबत सातत्याने बोलताना दिसून येत आहे. संजय राऊतांनी त्यावर बोलणं, त्यांचं मला काही वाईट वाटत नाही. कारण शरीर कुजकं, मन कुजकं, बुद्धी कुजकी असलेले राजकारणातील ते एक व्यक्ती आहेत. ते जीवनात कधी जनतेच्या समोर गेलेच नाहीत. आदित्य ठाकरेंना काय बोलायचे, हे शिकवणारेही संजय राऊतच आहेत.

दुर्दैवाने उद्धव ठाकरेही या संवादावर बालले, तो माझ्या ग्रामीण भागातील जनतेचा अपमान आहे. आमच्या गावरान भाषेवर टीका करण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. महाराष्ट्रात जन्माला का आला, हे उद्धव ठाकरेंचे विधान काळजाला भिडून गेलं. माझ्या त्या संवादात मी माझ्या मायभूमीविषयी (महाराष्ट्र) काही बोललोच नाही. आसाममधील निसर्गसौंदर्याचे मी वर्णन केले, त्यात काही चूक नाही. ते राष्ट्रीय एकात्मकतेचे प्रतीक आहे. उद्धव ठाकरे यांनी कोणताही विचार न करता आसामवर बोलणे योग्य नाही. आज तुम्ही आसामवर टीका केली, उद्या काश्मीर, राजस्थान, परवा केरळला जाऊ नका, अस म्हणाल. नेमके काय बोलायचं आणि सांगायचं याच गोष्टीचं यांना सध्याच्या या रागीट, चिडखोर स्वभावात भानं राहिला नाही, असे मी समजतो, असा टोलाही पाटील यांनी ठाकरेंना लगावला.

एकनाथ शिंदे यांचा डोळा शिवसेना पक्षप्रमुखपदावर आहे, या आरोपावर शहाजी पाटील म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीत प्रचार करत असताना उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक सभेत तुम्ही मला मते द्या; मी एका शिवसैनिकाला राज्याचे मुख्यमंत्री करून दाखवतो. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न आहे, असे बोलले. त्यात एकनाथ शिंदे यांचे नाव चर्चेत आघाडीवर होते. अनेक आमदारांना उद्धव ठाकरे तसे बाललेही होते. पण अचानक बदल झाला आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले.

शरद पवारांनी आग्रह धरल्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, असे उद्धव ठाकरे आता सांगत आहेत. शिवसेनेचे प्रमुख तुम्हा होता की शरद पवार होते. शिवसेनेचे निर्णय घेण्याचे अधिकारी शरद पवारांना नेमके कुणी दिले. शिवसेनेतील लोकांना तो अधिकार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना तो अधिकारच नाही. तुम्ही त्यांचं ऐकण्याचं काहीएक कारणं नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री झालं, याचं आम्हाला दुःख नाही. शिवसेना आमदार, नेत्यांना एकत्र घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. तो घेतला नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं, असा राष्ट्रवादीचा कायमच डोक्यावर हात राहिला. राज्याची सत्ता राष्ट्रतवादीच्या हाती एकवटली आणि आम्ही मंत्रालयत लेटर पॅड घेऊन नुसतं फिरत बसलो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT