Ayodhaya Ram Mandir News :  Sarkarnama
विशेष

Ram Mandir in Ayodhya : 'राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज...'; मुस्लिम विचारवंत इक्बालांच्या कवितेने अभिमानाने फुलते छाती!

अय्यूब कादरी

Ayodhya Ram Mandir News : प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म भारतात झाला, याचा भारताला गर्व आहे, अभिमान आहे. श्रीराम हे कुण्या एका जातीचे, धर्माचे भगवान नव्हते, तर ते समस्त भारतीयांचे गुरू होते, नेते होते... या ओळी आहेत उर्दूचे प्रसिद्ध शायर, कवी, विचारवंत अल्लामा इक्बाल (मुहम्मद इक्बाल) यांच्या राम या कवितेतील (नज्म). प्रभू रामचंद्रांवर त्यांनी ही कविता 1908 मध्ये लिहिली. ती 1924 मध्ये त्यांच्या 'बांग ए दरा' या संग्रहामध्ये प्रसिद्ध झाली. हे तेच अल्लामा इक्बाल आहेत, ज्यांनी सारें जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा... हे देशभक्तिपर गीत लिहिले होते. त्यांची उर्दू आणि पारसी भाषेतील शायरी सर्वोत्कृष्ट मानली जाते. पाकिस्तानचे जनक अशीही अल्लामा इक्बाल यांची ओळख आहे. (Latest Marathi News)

अयोध्येतील मंदिरात आज श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात झाली. देशभरात भक्तिमय वातावरण होते. सर्वजण रामभक्तीत तल्लीन झाले होते. श्रीरामांची मोहिनी भारतासह जगभरातील लोकांना आहे. उर्दू साहित्यिक, विचारवंतांनाही श्रीरामांनी भुरळ घातली होती. आजच्या या उत्साही वातावरणात 115 वर्षांपूर्वी आपल्या कवितेतून श्रीरामांना इमाम ए हिंद (भारताचे गुरु) म्हणणाऱ्या अल्लामा इक्बाल यांच्या कवितेची आठवण येणे साहजिक आहे. उर्दू शायरीत अल्लामा इक्बाल हे मिर्झा गालिब आणि मीर तकी मीर यांच्या श्रेणीतील समजले जातात. श्रीरामांचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यासाठी इक्बाल यांनी अहल ए नजर (समजूतदार, ज्ञानी, आध्यात्मिक लोक), इमाम ए हिंद (भारताचे गुरू, नेते) अशा शब्दांचा वापर केला आहे.

प्रभू रामचंद्रांवरील कविता लिहिली त्यावेळी अल्लामा इक्बाल हे जर्मनीत अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास करीत होते. अन्य भारतीयांप्रमाणे इक्बाल यांच्यावरही भारतीय स्वांतत्र्यलढ्याचा प्रभाव होता. भारतीय संस्कृतीपेक्षा आपली संस्कृती श्रेष्ठ आहे, असे युरोपियन लोकांना वाटत असे. युरोपियन लोकांचा हा समज चुकीचा आहे, भारतीय संस्कृती कोणत्याही प्रकारे युरोपियन संस्कृतीपेक्षा कमी नाही, हे त्यांनी संशोधनाद्वारे सिद्ध केले होते. त्याचवेळी त्यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयीची ही कविता लिहिली होती.

श्रीरामांनी भारतात जन्म घेतला, याचा भारतीयांना गर्व, अभिमान आहे, असे इक्बाल यांनी म्हटले आहे. श्रीराम कुण्या एका जातीचे किंवा धर्माचे नव्हते, तर ते समस्त भारतीयांचे गुरु होते. भगवान राम हे संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत, असे इक्बाल यांनी आपल्या कवितेत म्हटले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी 9 नोव्हेंबर 1938 रोजी तेव्हाच्या भारतात आणि आताच्या पाकिस्तानात असलेल्या लाहोरमध्ये त्यांचे निधन झाले.

प्रभू श्रीरामचंद्रांविषयी अल्लामा इक्बाल आपल्या कवितेत काय म्हणतात, हे समजून घेऊया -

है राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज

अहल-ए-नजर समझते है इस को इमाम-ए-हिंद

(श्रीरामांचा जन्म भारतात झाला याचा भारतीयांना अभिमान आहे,

आध्यात्मिक, समजूतदार लोक श्रीरामांना भारताचे गुरू, लीडर समजतात)

लबरेज़ है शराब-ए-हक़ीक़त से जाम-ए-हिंद

सब फ़लसफ़ी हैं ख़ित्ता-ए-मग़रिब के राम-ए-हिंद

(भारताचा प्याला सत्याने ओसंडून वाहत आहे,

पाश्चिमात्य देशांतील तत्त्वज्ञांनाही श्रीरामांची भुरळ आहे.)

ये हिन्दियों की फ़िक्र-ए-फ़लक-रस का है असर

रिफ़अत में आसमाँ से भी ऊँचा है बाम-ए-हिंद

(भारतीयांच्या महान चिंतनामुळे, जगभरात

देशाचे स्थान आकाशापेक्षाही उंच आहे.)

इस देस में हुए हैं हज़ारों मलक-सरिश्त

मशहूर जिन के दम से है दुनिया में नाम-ए-हिंद

(या देशात (भारत) अनेक महान देवता होऊन गेले,

ज्यांच्यामुळे भारताचे नाव जगभरात प्रसिद्ध झाले आहे)

एजाज़ इस चराग़-ए-हिदायत का है यही

रौशन-तर-अज़-सहर है ज़माने में शाम-ए-हिंद

(भारतीयांच्या ज्ञानाच्या चमत्कारामुळे भारतातील

सायंकाळ अन्य देशांच्या पहाटेपेक्षा मनोहारी असते.)

तलवार का धनी था शुजाअ'त में फ़र्द था

पाकीज़गी में जोश-ए-मोहब्बत में फ़र्द था

(श्रीराम हे तलवार चालवण्यात तरबेज

होते, शूर होते, त्यांचे प्रेम पवित्र होते)

(Edited By - Chetan Zadpe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT