Suresh Dhas-Dada Bhuse-Jitendra Awhad-Anil Patil Sarkarnama
विशेष

Assembly Session : विधानसभा दणाणून सोडली...भुसेंसह विरोधकांनी हुसकावलं; पण धसांनी शेवटपर्यंत ‘तो’ कृषिमंत्री कोण? हे सांगितलंच नाही!

Suresh Dhas Assembly Speech : हे कैलास पाटील ह्याचं आतडं वाकडं तिकडं झालंय, उपोषणाला बसून. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आमचे राणा जगजितसिंह पाटील हे शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या पैशासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. पण शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.

Vijaykumar Dudhale

Nagpur, 21 December : बोगस पीकविमा प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांनी विधानसभा दणाणून सोडली. बोगस पीकविम्याचा परळी व्हाया परभणी, धाराशिव, बीड या सर्व रसभरीत प्रवासही कथन केला. तत्कालीन कृषिमंत्री म्हणून उल्लेखही केला. वर्षही सांगितलं. पीकविमामाफिया, आपल्या शेजारचे बोगस पीकविमा पॅटर्नवाले, असा सांकेतिक इशाराही केला. विरोधकांनी पॉईंट ऑफ ऑर्डरच्या आधारे बोगस पीकविमा प्रकरणी नाव घ्या, असे हुसकावलेही. खुद्द माजी कृषिमंत्री दादा भुसेंनीही नाव घेण्याचे आवाहन केले. मात्र, धस यांनी शेवटपर्यंत तत्कालीन कृषिमंत्र्यांचं नाव काही घेतलं नाही. त्यांनी मी ३५ ची नोटीस दिली नाही, त्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही, एवढंच तुणतुणं वाजलं.

बोगस पीकविम्याच्या प्रकरणावरून सुरेश धस (Suresh Dhas) यांनी विधानसभेत विरोधकांची भूमिका पार पाडत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. ते म्हणाले खरे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळेनात. हे कैलास पाटील ह्याचं आतडं वाकडं तिकडं झालंय, उपोषणाला बसून. ते दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. आमचे राणा जगजितसिंह पाटील हे शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या पैशासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. पण तरीसुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही.

आमचे जामनेरचे प्रतिनिधी, आमचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जळगाव जिल्ह्याचाही पीकविमा (crop insurance) मिळाला का, हे विचारा ना. काय चाललंय अध्यक्ष. आम्हीच घोषणा केली, एक रुपयात पीकविमा...बजाव ढोल...ढोली मारो बजाव ढोल. एक रुपयात पीकविमा.. घ्या ढोल...परळी पॅटर्न आणि राज्याचे कृषिमंत्री कोण...मला त्यांचे नाव माहिती नाही, अध्यक्ष महोदय. दादा भुसे होते का....अनिल पाटील होते वाटतं, असं वक्तव्य धस यांनी केले.

साहेबराव पाटलांपासून आम्ही अमळनेर बघतोय. तुमचं आमळनेर तर लय कलाकर आहे. तुम्ही पहिल्यांदाच दुसऱ्यांदा निवडून आलं आहे. नाही तर दरवेळी नवीनच निवडून येतो. पार नंदूरबारहून चौधरी येतो. तेवढ्यात विरोधी पक्षाच्या बाकावरून तत्कालीन कृषिमंत्र्यांचं नाव घ्या ना, असे आवाहन करण्यात आले. नाही मी ३५ ची नोटीस दिली नाही, त्यामुळे मी नाव घेणार नाही. हा कालावधी २०२३-२४ चा आहे ना. २०२३ मध्ये थोडं साधलं, असं सूचक विधानही धस यांनी केले.

बीड जिल्ह्याचा सात हजार हेक्टरचा आकडा मी काल सांगितला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार हेक्टर क्षेत्रातील बोगस पीकविम्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. परभणीत २०२३ मध्ये वीस हजार हेक्टरवर बोगस पीकविम्याचा गैरव्यवहार झाला आहे. धाराशिव जिल्ह्यात भरलेले सर्व बोगस पीकविमावाले हे परळी तालुक्यातील आहेत. बीडमध्ये महसुली दर्जा नसलेल्या गावाचाही चार हजार हेक्टरचा पीकविमा भरलेला आहे.

आपल्या शेजारचे पॅटर्नवाले जे आहेत, त्यांनी चार हजार हेक्टरचा पीकविमा भरलेला आहे. परभणी जिल्ह्यातील या वर्षीचा आतापर्यंत माझ्याकडे आलेला आकडा हा चाळीस हजार हेक्टरचा आहे. या चाळीस हजार हेक्टरचा बोगस पीकविमा भरला आहे. आता जगावं की मरावं. का जावं हे राज्य सोडून. आम्हाला ‘पीओके’मध्ये नेऊन सोडायची व्यवस्था करावी, असे आवाहनही धस यांनी केले.

निवडणुकीच्या अगोदर हे सर्व केलेले आहे. पीकविमा माफियाची नवी डेफिनेशन तेवढी आणि आमच्या शेतकऱ्यांना हाकलून लावा. अशा पद्धतीने मंत्री काम करायला लागले, मी त्यांचे नाव घेत नाही. तेवढ्यात समोरून विरोधकांनी नाव घ्या, असे विरोधकांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला. मी ३५ ची नोटीस दिलेली नाही, त्यामुळे मी कोणाचंही नाव घेणार नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर कारवाईचे आदेश द्यावेत, अशी विनंती करतो, अशी मागणी धस यांनी केली आहे.

बोगस पीकविमा प्रकरणी सुरेश धस यांनी नाव घेतल्याने दादा भुसे यांनी हरकत घेतली. बोगस पीकविमा प्रकरणी सुरेश धस यांनी कृषिमंत्री असा उल्लेख केला आहे. पाठीमागच्या काळात ही जबाबदारी मीही पार पाडलेली आहे. पण माझी विनंती आहे की, त्यांनी निश्चित कालावधी आणि नावाचा उल्लेख केला तर संभ्रम राहणार नाही, अशी हरकत नोंदवली.

त्यावर सुरेश धस यांनी स्पष्टीकरण देताना २०२३ ते २०२४ या कालावधीतील कृषिमंत्री असं मी म्हटलंलं आहे. मी ३५ ची नोटीस दिल्याशिवाय कोणाचंही नाव घेता येत नाही, त्यामुळे मी नाव घेणार नाही, असे धस यांनी पुन्हा एकदा सांगितले.

त्यावर विरोधी पक्षातील जितेंद्र आव्हाड यांनी पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला. हवेत गोळीबार करायचं आणि इशारेवजा बोलायचं हेसुद्धा सभागृहात चांगलं नाही. एखाद्या मंत्र्यांच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह लागते. एखाद्या मंत्र्यांची प्रतिमा डागळली जाईल, असे घडू नये यासाठी एकदा स्पष्ट काय ते सांगावं. संशायाची सुई उगाच सगळीकडे फिरवता कामा नये. हा दादा भुसे यांच्यावर अन्याय आहे. असा अन्याय कोणत्याच मंत्र्यांवर होऊ नये, एवढंच माझं म्हणणं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT