Sharad Pawar, Uddhav Tackery, Nana Patole Sarkarnama
विशेष

Maharashtra Politics : MVA त मोठं राजकीय नाट्य! ठाकरेंची आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी, MLC निवडणुकीपूर्वी नेमकं काय घडलं?

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राज्यात 11 जागांसाठी विधान परिषद निवडणूक पार पडली. त्यात उद्धव ठाकरे यांनी आपला 12 वा उमेदवार दिल्याने ही निवडणूक चुरशीची झाली. यात महायुतीचे सर्व 9 तर महाविकास आघाडीचे 3 पैकी 2 उमेदवार निवडून आले.

सर्व पक्षांत संबंध असलेल्या ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकरांना विजयाच्या मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दीर्घ काळ झुंजावे लागले. तर शरद पवार यांनी पाठिंबा दिलेल्या जयंत पाटील यांचा दारूण पराभव झाला. मात्र 'आज तक'च्या वृत्तानुसार या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत मोठा वाद झाल्याची माहिती आहे.

नार्वेकरांचा विजय काँग्रेसच्या मतांनी सुकर झाला असे बोलले जात आहे. मात्र काँग्रेसमध्ये पवारांनी पाठिंबा दिलेले जयंत पाटील की ठाकरेंचे नार्वेकर यांना मत देण्यावरून दोन गट पडले होते. तर काँग्रेसने ठाकरेंना मतदान देण्यासाठी तयार केलेल्या यादीवर उद्धव ठाकरेंचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी नार्वेकरांना मत देतील अशा आमदारांची यादीच काँग्रेसला दिली.

मतदानाच्या आदल्या रात्री इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेनिथला यांच्यात बैठक झाली. त्यावेळी दोन्ही पक्षांत मतदार आमदारांच्या यादीवरून जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर नार्वेकरांना मतदान करणाऱ्या आमदारांच्या नावांत बदल करून दुसरी यादी तयार केली. त्यास ठाकरेंनी मान्यता दिल्याचीही चर्चा आहे.

निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांच्या एका बैठकीत शरद पवार गटाचे समर्थक उमेदवार जयंत पाटलांच्या मुलागा आणि पुतण्याने गोंधळ घातला. त्यांनी ठाकरे सेनेचे नेते अनिल देसाई यांच्यावर उमेदवार जयंत पाटलांच्या विरोधात कट रचत असल्याचा आरोप केला. यानंतर ठाकरे गट आणि उमेदवार जयंत पाटील यांच्यातील तणाव वाढला. यावरून उद्धव ठाकरे चिडले.

पवारांचे फोन घेतले नाहीत?

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोडण्याची भाषा केल्याची माहिती आहे. विधानपरिषद निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांचा पराभव झाल्यास महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी उद्धव ठाकरेंनी दिल्याचेही या वृत्तात नमूद केले आहे. तसेच निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी मात्र त्यांच्या फोनला उत्तर दिले नसल्याचीही माहिती आहे. त्यामुळे आघाडीतील वाद विकोपाला गेल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

निवडणुकीत काय झालं?

ठाकरे शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे पहिल्या पसंतीची (ठाकरे गटाची 15 आणि काँग्रेसची 7 आणि अपक्ष 1) 23 मते घेऊन विजयी होणे अपेक्षित होते. मात्र नार्वेकर दीर्घ काळ 17 आणि नंतर 22 मतांवर अडकले.

एका मतासाठी त्यांना खूप संघर्ष कारावा लागला. पहिल्या पसंतीच्या मतांतील काँग्रेसचे एक मत फुटल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मते घेऊन नार्वेकर विजयी झाले, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

दरम्यान, लोकसभेत चांगले यश मिळवल्यानंतर विधान परिषदेत झालेली पिछेहाट महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागली आहे. त्याबाबत काँग्रेसने गद्दार आमदारांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, तत्पूर्वी घडलेल्या घडामोडींमुळे आघाडीत तणावाचे वातावरण असल्याचे बोलले जाते. आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आघाडीतील नेते काय निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT