Uddhav Thackeray-Raj Thackeray
Uddhav Thackeray-Raj Thackeray Sarkarnama
विशेष

‘उद्धव ठाकरेंनी घेतलेली ती शपथ राज ठाकरेंना आजही वेदना देते’

विश्वभूषण लिमये

सोलापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाची (chief minister post) शपथ घेतली होती. ती जखम आजही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनाला वेदना देत आहे, त्यामुळे ते बेताल पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतात, असे प्रत्युत्तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला दिले. (Uddhav Thackeray's swearing-in as chief minister still pains Raj Thackeray : Nilam Gorhe)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गट प्रमुखांचा मेळावा रविवारी मुंबईतील गोरेगाव येथे झाला. त्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला नीलम गोऱ्हे यांनी आज (ता. २८ नोव्हेंबर) सोलापुरात प्रत्युत्तर दिले.

विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या की, जी व्यंग्य नाहीत, त्याला शोधून आणायचे आणि मिमिक्री करायची. याला दूषित दृष्टी म्हणतात किंवा सडलेली दृष्टी म्हणतात. शिवसेनेला उपद्रव मूल्य म्हणून राज ठाकरे आपली भूमिका मांडतात, या पलीकडे दुसरं काही नाही.

अमृता फडणवीस ह्या सक्रिय राजकारणात आहेतच. कारण, जे लोक ‘वर्षा’च्या भिंतीवर लिहून ठेवू शकतात, ते लोक राजकारणात किती सक्रिय आहेत, हे दिसून येते, असेही गोऱ्हे म्हणाल्या. रामदेवबाबांच्या विधानावर बोलताना त्या म्हणाल्या की, रामदेव बाबा माफी मागणारच होते. मात्र जो बुंद से गई ओ हौद से नही आती.

ज्यांच्याबद्दल फडणवीस बोलत आहेत, त्यांच्यासमोरच तुम्ही गुवाहटीचा प्रयोग स्पॉन्सर केला होतात. तुम्हाला आणि समर्थकांना वाईट वाटत असलं तरी मुख्यमंत्री सोडून उपमुख्यमंत्री झालात. अशावेळी कोणाला काही बोलत असताना त्यांना राग येणे स्वाभाविक आहे. पण, फडणवीसांनी आधीच स्पष्ट केले की मी उद्धवजींचा सूड घेतला. उत्तराला उत्तर देण्यापेक्षा हेतूवर संशय घेणे, हे बरोबर नाही, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फ्रिज खोकेबाबतची टीका निराधार आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्गातून दीपक केसरकर यांच्या विरोधात किती तक्रारी होत्या, याचा विचार त्यानी करायला हवा. उद्धव साहेबांनी किती लोकांना डावलून त्यांच्यावर विश्वास टाकला होता. परिस्थितीमुळे एकनाथ शिंदे मजबूर आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय प्रसिद्धी मिळत नाही. जसं नारायण राणेंचं झालं तसंच शिंदे गटांचं होणार, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.

पंढरपूर कॉरीडोरबाबत गोऱ्हे म्हणाल्या की, पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात एसपी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. आराखडा करताना त्यांनी बळाचा वापर करू नये. मागील १७ वर्षापासून सरकारने ज्या घोषणा केल्या, त्या प्रश्नांची अंमलबजावणी काय झाली, याचा आढावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयाला सादर करावा. त्यानंतरच तुम्ही पंढरपूर कॉरिडोरवर काम करावे. वाराणसीची आजची परिस्थिती पहावी. जर पंढरपूरचा विकास करायचाच असेल तर शेगाव किंवा तिरुपतीचा अभ्यास करावा, अशी सूचनाही विधान परिषदेच्या उपसभापती गोऱ्हे यांनी केली.

नाशिकमधील आश्रम शाळेतील घटनेबाबत आश्रम शाळेचे नाव घेऊ नये, त्यामुळे त्या मुलींची ओळख समजत आहे. त्या मुलींचे समुपदेशन झाले पाहिजे. सर्व स्तरातील मुलींसाठीच्या आश्रम शाळांचे जिओ मॅपिंग झाले पाहिजे. अशा गुन्हेगारांना आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षाही गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT