New Delhi, 04 February : महाराष्ट्रातील पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात लोकसभेत मांडला. त्याला केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तर देताना ‘पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येईल, त्यात दोषी आढळल्यास गडबड करणाऱ्यांना सोडणार नाही,’ असा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांच्या या उत्तरामुळे आधीच अडचणीत सापडलेले माजी कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेत आज पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराचा विषय मांडला. त्या म्हणाल्या, महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीकविमा योजनेत तब्बल पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली ऑन रेकॉर्ड दिली आहे. त्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी कृषिमंत्री कोकाटे यांना दुरुस्त करताना पीकविमा योजनेत पाचशे कोटी नव्हे; तर पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.
गेल्या अडीच वर्षांपासून आणि सध्याही भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आहे. आपल्या सरकारमधील कृषिमंत्री आणि आपल्याच पक्षाचे आमदार यांनी पीकविमा योजनेतील पाच हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत आपल्याला अवगत केले आहे. तुम्हाला अवगत केले नसेल तर तुम्ही या प्रकरणी चौकशी करणार का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान (ShivrajSinh Chauhan) यांना विचारला.
खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराच्या प्रश्नाला कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मला तर मॅडमच अवगत करीत आहेत. कधी पाचशे तर कधी पाच हजार कोटी रुपये अशा जुमल्यांवर काही गोष्टी होत नसतात. पण, लोकसभेच्या माध्यमातून मी देशातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, कुठे गडबड झाली आणि ती सिद्ध झाली तर गडबड करणाऱ्याला सोडणार नाही. ही आमची कटिबद्धता आहे.
महाराष्ट्र सरकारने पीकविमा योजनेत काही सुधारणा केल्या आहेत. महाराष्ट्रात ८० आणि ११० चे मॉडेल लागू करण्यात आले आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की कुठे गडबड झाली असेल तर त्याची चौकशी होईल. चौकशीत कोणी दोषी आढळलं तर गडबड करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, हे आमचं सरकार आहे, असा इशाराही चौहान यांनी दिला आहे.
आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत आणि सभागृहाच्या बाहेर पीकविमा योजनेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची कबुली माध्यमांशी बोलताना दिली होती. त्यानंतर सुरेश धस यांनी तो पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे म्हटले होते. त्या कालावधीत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) होते, त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उत्तराने मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.