Uddhav Thackeray, Book of Sharad Pawar
Uddhav Thackeray, Book of Sharad Pawar Sarkarnama
विशेष

Supreme Court's Final Decision : ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत न्यायालयाने जे सांगितले; तेच पवारांच्या पुस्तकात !

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra's Political Crisis : महाविकास आघाडीचे सरकार खेचण्यासाठी भाजप सर्व प्रयत्न करणार याची जाणीव होती. मात्र शिवसेनेतच फूट पडेल यांचा अंदाज आला नाही. त्यानंतर निर्माण झालेल्या प्रसंगाला सामोरे जाण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा दिला. परिणामी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यांनी संघर्ष करायला हवा होता, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात व्यक्त केले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. न्यायालयानेही तेच निरीक्षण नोंदविले.

आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविले असते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरतात. त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काहीही सांगितले नसल्याचा दावा पवार यांनी केला होता. त्याला ठाकरे यांनीही पुष्टी दिलेली आहे. आज ठाकरे यांनी आपण राजीनामा का दिला, याचे कारणही स्पष्ट केले. ठाकरे म्हणाले, "मी दिलेला राजीनामा हा चुकीचा असू शकतो. हापापलेल्या लोकांनी माझ्याविरोधात अविश्वास आणावा आणि मी त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्ताव सामोरे जाणे हे मला मंजूर नव्हते. सगळे काही देऊनही ज्यांनी माझ्या पाठीत वार केला त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे काही मला पटलेले नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून मला विश्वासदर्शक ठरावाबद्दल विचारले जात असेल तर ते अयोग्य वाटल्याने मी राजीनामा दिला."

सत्तासंघर्षाच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आम्ही मुख्यमंत्री केले असते, असे स्पष्ट केले आहे. हेच शरद पवार यांनी त्यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकात मांडले आहे.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणतात, "राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याचा आभाव उद्धव ठाकरे यांच्यात जाणवला. शिवसेनेतील बंडाळीनंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला त्यांनी सामोरे जायला हवे होते. मात्र त्यांनी तात्काळ राजीनामा दिला अन् सरकार कोसळले."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT