BJP and Congress
BJP and Congress Sarkarnama
विशेष

Pay-CM and G-Pay : कुठं 'पे-सीएम' तर कुठं 'जी-पे'; महाराष्ट्रातील टक्केवारी माहीत आहे का?

सरकारनामा ब्यूरो

Election and Campaign : कर्नाटकमध्ये काँग्रेसने २२४ पैकी तब्बल १३५ जागा जिंकून एकहाती सत्ता स्थापन केली. दरम्यान, कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच्या भाजप सरकारला भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून चांगलेच घेरले होते. काही कंत्राटदारांनी विकासकामांचे टेंडर मिळविण्यासाठी सरकारला ४० टक्क्यापर्यंत कमिशन द्यावे लागत असल्याचा आरोप केला होता. तोच मुद्दा काँग्रेसने उचलून धरला. तत्कालीन भाजप सरकार ४० टक्क्यांचे सरकार असल्याच्या घोषणाच प्रचारात देण्यात आल्या.

कर्नाटकमध्ये (Karnataka) काँग्रेसने संपूर्ण प्रचारात 'पे-सीएम' असा नारा दिला. विकासकामांतील कमिशन थेट मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे जाते, असा आरोप करून काँग्रेसने 'पे-टीएम' वरून 'पे-सीएम' अशी मोहीम राबविली. त्याबाबत राज्यभर 'क्यूआर कोड' तयार केले. त्या 'क्यूआर कोड'वर तत्कालीन मुख्यमंत्री बोम्मई (Basavraj Bommai) यांचा फोटो लावला होता. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजप सरकारला काँग्रेसने चांगलेच घेरले. हा प्रचार इतका प्रभावी झाला की भाजपला त्यावर काहीही उत्तर देता आले नाही. काँग्रेसचा हाच मुद्दा आता इतर राज्यात वापरला जात असल्याचे दिसून येत आहे.

राजस्थानमध्ये (Rajsthan) काँग्रेसचे सरकार आहेत. तेथे अशोक गेहलोत (Ashok Gehlot) मुख्यमंत्री आहेत. या सरकारवर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केला आहे. शेखावत म्हणाले, "गेहलोत सरकार हे लोकशाहीप्रधान भारताच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. गेहलोत सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आज राजस्थानमधील जी-पे (गुगल-पे) 'गेहलोत-पे' (G-Pay) झाला आहे." राजस्थानमध्ये गेहलोत सरकारवर 'जी-पे' झाल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. दरम्यान, राजस्थानमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे.

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस (State Government) यांच्यावरही आता टक्केवारीचा आरोप होऊ लागला आहे. राज्यात शिवसेना फुटल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. दरम्यान, शिंदे गटातील आमदारांवर ५० 'खोके' घेतल्याचा आरोप होत आहे. हे सरकार 'खोके'वाल्यांचे असल्याचे वारंवर ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून होत आहे. आता या टक्केवारीच्या आरोपाचीही भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी हे सरकार ५० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला. त्यावेळी ते शिंदे-फडणवीस सरकार ५० टक्क्यांचे सरकार असल्याचे म्हणाले होते.

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून प्रभावीपणे प्रचार केला. त्यामुळे काँग्रेसला मोठे यश प्राप्त केले, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या निवडणुकीनंतर देशभरात भ्रष्टाचाऱ्याच्या आरोपांचा 'ट्रेंड' बदलत असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये ४० टक्के, 'पे-सीएम' असा आरोप केला गेला. त्यानंतर राजस्थानमध्ये आता गेहलोत सरकारवर 'जी-पे' असा आरोप होत आहे. तर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकारवर ५० टक्क्यांचा आरोप होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT